- न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (निवृत्त)मुक्तीचा संग्राम संपला आहे, असं मी मानत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाले, पण स्वराज्य प्राप्त झालेलं नाही. महात्मा गांधींनी कधीही ‘स्वातंत्र्य’ शब्द वापरला नाही. त्यांचा शब्द होता स्वराज्य. ते अजून स्थापन झालेलं नाही. धार्मिक, आर्थिक, सामाजिक असल्या कुठल्याच गुलामगिरीतून आपण खऱ्या अर्थाने अजूनही मुक्त झालेलो नाही. या सर्व क्षेत्रांत अजून मुक्तीच्या आंदोलनाची गरज आहे.सत्तेचं विकेंद्रीकरण झालं नाही, उलट केंद्रीकरण झालं. ‘बुनियादी शिक्षण’ ही गांधीजींची भावना होती, ती शिक्षण क्षेत्रात आली नाही. आम्ही मुंबईच्या ज्या भागात राहतो तेथील कुठल्याही घरामध्ये मातृभाषा मराठी राहिलेली नाही. म्हणजे कुठल्याच घरामध्ये असा नातू नाही, जो आजी-आजोबाला मराठी भाषेतून पत्र लिहू शकेल. म्हणून इंग्रज गेले अंग्रेजियत कायम आहे. आम्ही दोनच प्रकारचे स्वातंत्र्य मानत होतो, एक त्यागावर आधारित दुसरे भोगावर आधारित. त्यागावर आधारित संस्कृती जोपर्यंत प्रस्थापित होत नाही आणि गांधींची ग्रामस्वराज्याची कल्पना जोपर्यंत सार्थक होत नाही, तोपर्यंत स्वराज्य आलं असं आम्हाला वाटत नाही. स्त्रियांबद्दलचा प्रश्न, मजुरांचा प्रश्न असो वा शेतकऱ्यांचा प्रश्न असो सर्व क्षेत्रांत अजूनही मुक्तीच्या चळवळींची गरज आहे. श्रमाला प्रतिष्ठा नाही म्हणून कोणीही शेती करू इच्छित नाही. प्रतिष्ठेचं जगणं याला आम्ही स्वातंत्र्य म्हणतो, स्वराज्य म्हणतो; जे अजून मिळायचं आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत आज मुक्तीच्या चळवळीची गरज आहे.
(लेखकांनी छोडो भारत चळवळीत सहभाग घेतला होता.)