शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

आजचा अग्रलेख: शक्तिपीठ मार्गाचा घाट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 05:59 IST

कोणत्याच शक्तिपीठाला जाण्यासाठी नवा मार्ग तयार करण्याची गरज नाही. केवळ कंत्राटी धार्जिणे कामे काढून लोकांवर आर्थिक बोजा वाढविण्याचे उद्योग आहेत.

महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे आणि आवश्यक प्रकल्प निधीअभावी रेंगाळलेले असताना कोणीही मागणी न केलेला तसेच गरज नसलेला शक्तिपीठ महामार्गाचा घाट राज्य सरकारने घातला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चार विभागातील बारा जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गासाठी २७ हजार एकर शेतजमिनीचे वाटोळे करणारा हा घाट आहे. एकूण ८०५ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ८६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. सरासरी १०७ कोटी रुपये प्रतिकिलोमीटर खर्च होणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणीच केली नव्हती. शिवाय या महामार्गाची गरज देखील नाही. गोव्यातील मंगेशी, कोल्हापूरची अंबाबाई, नृसिंहवाडीचे दत्त देवस्थान, तुळजापूरची भवानी माता आदी शक्तिपीठे या मार्गाने जोडणार आहोत, असा आव आणण्यात आलेला आहे. वास्तविक सध्या नागपूर ते रत्नागिरीच्या महामार्गाचे काम चालू आहे. तो नागपूर ते नांदेड, लातूर, तुळजापूर, सोलापूर, सांगली-मिरज आणि कोल्हापूरमार्गे कोकणात रत्नागिरीला पोहोचतो आहे. सांगली ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते रत्नागिरी एवढ्याच अंतराचे काम व्हायचे आहे. उर्वरित काम पूर्ण झाले आहे.

समृद्धी महामार्गाने वर्ध्यापर्यंत येऊन यवतमाळ, नांदेड, हिंगोली, औंढानागनाथमार्गे लातूर आदी जिल्ह्यातून सोलापूर आणि सांगलीजवळून कोल्हापूर जिल्ह्यात हा महामार्ग प्रस्तावित आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्गालाच समांतर हा मार्ग आखला गेला आहे. वास्तविक नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना तसेच या मार्गाने सर्व शक्तिपीठांच्या स्थानकांना सहज जाता येत असताना हा घाट घालण्याची काहीच गरज नव्हती. अनेक नाले बुडवित, अनेक नद्या अडवीत सिंचनाखालील शेतीतून हा महामार्ग जाणार आहे. शंभर मीटर रुंदीचा असल्याने हजारो एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत, तरीदेखील इंग्रजी वृत्तपत्रात जमीन अधिग्रहणाची जाहिरात देऊन सरकार या रस्त्याचे काम पुढे दाटत आहे. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने या महामार्गाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक हा महामार्ग रद्दच करा, अशी शेतकऱ्यांची मागणी असताना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, ती शेतकरी मान्य करणार नाहीत. सांगली आणि कोल्हापूरचा शेतकरी या महामार्गाच्या विरोधात संघटित होऊन पेटून उठला आहे. बारा जिल्ह्यातील सुमारे दहा लोकसभा मतदारसंघात या विषयावरून शेतकरी मतदारांनी मतदानातून महायुतीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरला शेतकऱ्यांनी मोर्चा काढून प्रखर विरोध करण्याची भूमिका मांडली. तेव्हा कुठे सरकारला जाग आली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच जमीन अधिग्रहण केले जाईल, असे आता सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे सांगत आहेत. कृष्णा खोऱ्यातील महापूरप्रवण आठ नद्यांवरून हा महामार्ग जाणार आहे. कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, सीना, भीमा, गोदावरी आदी मोठ्या नद्यांच्या खोऱ्यात महामार्ग तयार करण्यासाठी भराव टाकले जाणार आहेत.

अलीकडे अनेक मार्गावर नद्यांवर उंच पूल बांधले आहेत, त्यासाठी भराव टाकून रस्ते केल्याने पाणी पुढे सरकतच नाही. परिणामी दरवर्षी महापुराच्या संकटाची टांगती तलवार आहे. नद्यांना अडवून तयार होणारा हा मार्ग कोणाला हवा आहे? कृष्णा खोऱ्यातील अडविलेले पाणी शिल्लक राहते ते सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना द्यावे, त्यासाठीच्या योजना गेल्या चाळीस वर्षांपासून रखडल्या आहेत. त्यासाठी तरतूद न करता शक्तिपीठांना जोडणारा महामार्ग बांधण्याचा घाट घातला गेला आहे. या सर्व शक्तिपीठांना जोडणारे रस्ते अनेक शतकापासून आहेत. पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने येण्यासाठीचे मार्ग आहेत. वारकरी भक्तिभावाने चारही दिशांनी पायी-पायी येतो आणि परत निघून जातो. कोणत्याच शक्तिपीठाला जाण्यासाठी नवा मार्ग तयार करण्याची गरज नाही. केवळ कंत्राटी धार्जिणे कामे काढून लोकांवर आर्थिक बोजा वाढविण्याचे उद्योग आहेत. गरज नसलेले महामार्ग तयार करून सर्वसामान्य जनतेच्या खिशातून लाखो-कोटी रुपये वसुलीचा धंदा नव्याने सुरू होणार आहे. लोकांच्या कल्याणाच्या नावाने ही नवी सावकारी सुरू झाली आहे. शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्ताव रद्द करण्यातच साऱ्यांचे हित आहे, हे आता सरकारने समजून घ्यावे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार