शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

असंवेदनशीलतेचे बळी; स्वराज्य मिळाले तरी सुराज्यापासून कोसो दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2023 07:48 IST

भारताचा स्वातंत्र्य दिन आज देशभर दिमाखात साजरा केला जाईल. देश स्वतंत्र होऊन सात दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावरही मुंबई ...

भारताचा स्वातंत्र्य दिन आज देशभर दिमाखात साजरा केला जाईल. देश स्वतंत्र होऊन सात दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावरही मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीला खेटून असलेल्या ठाणे शहराच्या कळव्यातील महापालिका रुग्णालयात शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत १८ गोरगरीब रुग्णांचे किरकोळ आजारांमुळे मृत्यू झाले, यामुळे खरेतर आपली मान शरमेने खाली जायला हवी. आपल्याला स्वराज्य मिळाले; पण, सुराज्यापासून आपण अजून कोसो दूर आहोत, हेच जळजळीत वास्तव आहे. आरोग्य सुविधा ही मूलभूत गरज आहे. परंतु, तीही पूर्ण होत नसेल आणि फोर्ब्सच्या यादीत किती भारतीय अब्जाधीशांचा समावेश झाला याकरिता जर आपण आपली पाठ थोपटून घेत असलो तर आपण आत्मवंचना करून घेत आहोत. 

ब्रिटिश सत्ताधारी जुलमी होते. त्यांनी भारतीयांचा छळ केला. मात्र, त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या आरोग्याकरिता जे. जे. हॉस्पिटल अथवा केईएम हॉस्पिटल अशी आरोग्य सेवा मुंबईत उभारून स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या भारतीयांच्या अनेक पिढ्यांवर उपकार केले. स्वतंत्र भारतामधील आपल्या सरकारांनी उभ्या केलेल्या इस्पितळांची काही ठिकाणची अवस्था ही छळछावण्यांपेक्षा वेगळी नाही. अनेक इस्पितळांत जाणाऱ्या रुग्णांची पावले दिसतात, परतीची पावले दिसत नाहीत, असे उघडपणे बोलले जाते. ठाण्यातील सरकारी इस्पितळाची नव्याने उभारणी सुरू असून, सध्या हे हॉस्पिटल मनोरुग्णालयाच्या इमारतीत हलवले आहे. मध्यवर्ती भागातील ते इस्पितळ उपलब्ध नसल्याने बहुतांश रुग्णांनी कळव्यातील महापालिका रुग्णालयाचा पर्याय निवडल्याने या रुग्णालयावर प्रचंड ताण आल्याचा दावा महापालिका करीत आहे. 

परिणामी, आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने मृत्यू झाले, असा बचाव केला जात आहे. ठाण्यासारख्या २८ ते ३० लाख लोकवस्तीच्या शहरातील सरकारी इस्पितळ अन्यत्र हलविल्यामुळे नेमकी कोणती परिस्थिती उद्भवू शकते, याचे आकलन जर सरकार व महापालिकेतील अधिकाऱ्यांना होत नसेल तर त्यांनी लागलीच पदांचे राजीनामे देऊन आपल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारायला हवी. ठाणे शहरातील इस्पितळांत केवळ याच परिसरातील नव्हे, तर अगदी शेजारील आदिवासीबहुल पालघर, शहापूर येथून किंवा नाशिक, रायगड जिल्ह्यातून रुग्ण येतात. ठाण्यातील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने या मृत्यूच्या तांडवाचे राजकारण होणे स्वाभाविक आहे. अर्थात अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे हा जरी दोष असला तरी ठाणे शहरातील सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या यंत्रणेने आरोग्याच्या मूलभूत सुविधेकडे अक्षम्य दुर्लक्ष कसे केले, या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. 

१९४३ साली आरोग्य व्यवस्थेबाबत नियुक्त केलेल्या जोसेफ विल्यम भोर समितीने केलेल्या शिफारशी १९५२ साली सरकारने स्वीकारल्या. भोर समितीनुसार, ४० हजार लोकसंख्येकरिता एक प्राथमिक आरोग्य केंद्र हवे. त्यामध्ये दोन डॉक्टर, एक नर्स, चार आया, दोन आरोग्य सहायक, दोन सॅनिटरी इन्स्पेक्टर एवढा कर्मचारी वर्ग हवा, असे म्हटले होते. भोर समितीच्या शिफारशींना ८० वर्षे उलटली. आता एका आरोग्य केंद्रात वरील कर्मचारी वर्गाच्या किमान चौपट कर्मचारी वर्ग असायला हवा. २० हजार लोकसंख्येकरिता ७५ खाटांचे इस्पितळ हवे तर सर्व जिल्हा रुग्णालये २५०० खाटांची हवीत, असे भोर समितीने त्यावेळी म्हटले होते. राज्यातील किती जिल्ह्यांत भोर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली आहे, असा प्रश्न केला तरी आपले आपल्यालाच उत्तर मिळेल. कोरोनाने आरोग्य सेवेचे महत्त्व आपल्याला पटवून दिले. 

आपली आरोग्य व्यवस्था किती तोकडी आहे हे त्यावेळीही मृत्यूच्या घनघोर तांडवाने आपल्याला कळून चुकले. परंतु भारतीय राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेलाच अल्झायमर झाला असल्याने कोरोनाचे साथ संकट टळल्यावर आपल्याला सोयीस्कर विसर पडला. अनेक ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर आली. पावसाळ्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढल्यावर पुन्हा आरोग्य व्यवस्थेमधील उणिवा जाणवू लागल्या. कोरोनानंतरही आपण आरोग्यावर जीडीपीच्या केवळ २.१ टक्के रक्कम खर्च करीत आहोत. प्रत्यक्षात ती किमान सहा ते आठ टक्के असायला हवी. पण, तसे होत नाही आणि सरकारी यंत्रणेची अनास्था गोरगरिबांचे बळी घेतच राहते. ठाण्यात झाले, ते त्याहून वेगळे नाही, आपल्या अदूरदर्शी, असंवेदनशील, अमानुष राजकीय व्यवस्थेनेच हे बळी घेतले, हे नाकारता येणार नाही.

 

टॅग्स :kalwaकळवाhospitalहॉस्पिटल