शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
3
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
4
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
5
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
6
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
7
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
8
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
9
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
10
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
11
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
12
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
13
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
14
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
15
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
16
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
17
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
18
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
19
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
20
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

दलित चळवळ ‘भूतकाळा’तून बाहेर पडेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 7:38 AM

फुले-शाहू-आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिले ते आज भंगताना दिसते आहे. अशा वेळी सांस्कृतिक राष्ट्रवादाविरुद्ध सर्वांनी एकत्रितपणे सामोरे जाणे गरजेचे आहे.

बी. व्ही. जोंधळे, दलित चळवळीचे अभ्यासक, छत्रपती संभाजीनगर.

देशभरातील दलित समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर दि. ९ जुलै १९७२ रोजी नामदेव ढसाळ, ज. वि. पवार आदींनी शेकडो दलित तरुणांच्या उपस्थितीत स्थापन केलेल्या दलित पँथरने महाराष्ट्रात एक झंझावात निर्माण करतानाच खेडोपाडी दलित समाजावर अत्याचार करणाऱ्या जातदांडग्यांच्या उरात धडकी भरवली होती. 

पँथरच्या वादळी सभा, त्यांची विद्रोहातून जन्मलेली शिवराळ भाषा, तत्कालीन शिवसेना नेतृत्वाशी त्यांनी घेतलेला पंगा, यामुळे महाराष्ट्राचे समाजजीवन ढवळून निघाले होते. राजा ढाले, अर्जुन डांगळे, अरुण कांबळे, भाई संगारे, लतीफ खाटीक प्रभृतींनीही दलित पँथरला उभारी देण्यात मोठी उल्लेखनीय भूमिका निभावली, पण आंबेडकरी चळवळीला जो एक पूर्वापार बेकीचा शाप जडला आहे त्याची लागण दीड-दोन वर्षांतच दलित पँथरलाही झाली आणि वैयक्तिक हेवेदावे व आंबेडकरवाद की मार्क्सवाद असा वैचारिक वाद होऊन पँथर फुटली. 

यातूनच राजा ढालेंनी पँथर बरखास्तीचा निर्णय घेऊन त्यांची ‘मास मूव्हमेंट’ काढली. पण राजा ढालेंचा हा निर्णय मान्य नसणाऱ्या रामदास आठवले, अरुण कांबळे, एस. एम. प्रधान, गंगाधर गाडे, टी. एम. कांबळे, ॲड. प्रीतमकुमार शेगावकर, दयानंद मस्के, नाना रहाटे आदींनी औरंगाबादेत (आजचे छत्रपती संभाजीनगर) एक बैठक घेऊन भारतीय दलित पँथरची स्थापना केली. पण १९८९ च्या रिपब्लिकन ऐक्यात सर्वच दलित नेत्यांनी आपापल्या संघटना बरखास्त करून त्या रिपब्लिकन ऐक्यात विसर्जित कराव्यात, अशी भूमिका काहींनी घेतल्यामुळे रामदास आठवले यांनी भारतीय दलित पँथर बरखास्त करून ती रिपब्लिकन पक्षात विलीन करून टाकली आणि सामाजिक अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढाऊ भूमिका घेणारे एक चांगले सामाजिक संघटन मोडीत निघाले. 

गंमत म्हणजे पुढे रिपब्लिकन पुढाऱ्यांच्या नावे बोटे मोडून ज्या पँथर नेत्यांचा उदय झाला होता, ते पँथर नेते सत्तेच्या तुकड्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वळचणीला जाऊन बसले. आताचा कहर तर असा की, ज्या भाजपच्या धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्रवादाविरुद्ध लढायचे आहे ते एकेकाळचे केंद्रीय समाज राज्यमंत्री रामदास आठवले भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. 

अशा रीतीने ज्या पँथरचे अवतारकार्यच संपले त्या पँथरचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे कार्यक्रम गेले वर्षभर महाराष्ट्रात होत आले. आता छत्रपती संभाजीनगरात १४ ऑक्टोबरला पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता होत आहे. भूतकाळाचे स्मरण केव्हाही प्रेरणादायीच असते. पण, जिथे आंबेडकरी चळवळीलाच एक मरगळ येऊन चळवळच शकलांकित झाली आहे तिथे भूतकाळात किती रमावे, असा प्रश्न पडला तर तो अनाठायी कसा म्हणता येईल? 

देशात काही वर्षांपासून एक अस्वस्थ वातावरण तयार झाले आहे. दलित समाजावर, आदिवासी, स्त्रियांवर वाढत्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. अल्पसंख्याकांचे माॅबलिचिंगमध्ये झुंडबळी जात आहेत. भारताची लोकसंख्या १४० कोटी आहे. इथे १२१ भाषा व २७० बोलीभाषा आहेत. ४६१ जमाती आणि अनेक धर्म, पंथ आहेत. हा वैविध्यपूर्ण भारत संविधानाने एकत्रित ठेवला आहे, पण आता एक राष्ट्र, एक धर्म, एक राजकीय पक्ष, एक भाषा अशी राजकीय नि सामाजिक व्यवस्था आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या गोष्टी लोकशाहीस मारक आहेत. 

संविधानाला अभिप्रेत असलेला भारतीय समाज निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. हिंदू राष्ट्राची भाषा बोलली जाऊ लागली आहे. सांस्कृतिक दहशतवाद फोफावत आहे. जातिविहीन, धर्मविहीन, धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ, समाजवादी भारत घडविण्यापासून देश दूर जात आहे. 

प्रश्न असा आहे की, फुले-शाहू-आंबेडकर, म. गांधी, पंडित नेहरू यांनी नवसृजनाची, नवजीवनाची उभारणी करणाऱ्या आदर्श इंडियाचे जे स्वप्न पाहिले होते तेच आज भंगताना फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ धर्मनिरपेक्ष लाेकशाही नि संविधानासमोर उभे ठाकलेले आव्हान कसे पेलणार आहे? या प्रश्नाचे एकच उत्तर संभवते ते म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवादाविरुद्ध संविधाननिष्ठ राष्ट्रवाद्यांनी आपसातील मतभेद बाजूस ठेवून एकत्रितपणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीस प्रगल्भ नि प्रौढ शहाणपण दाखवून सामोरे गेले पाहिजे. अर्थात ही महनीय ऐतिहासिक जबाबदारी फक्त फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचीच नाही तर समता-स्वातंत्र्य-बंधुभाव-लाेकशाही-सेक्युलॅरिझम मानणाऱ्या सर्व डाव्या पक्षांची नि तमाम भारतीयांची आहे, हे वेगळे सांगणे नको. दुसरे काय?