ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी केली बिझनेसमनची फसवणूक? कोर्टाकडून समन्स जारी; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:41 IST2024-12-10T11:41:15+5:302024-12-10T11:41:48+5:30
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना कोर्टाकडून एका प्रकरणात समन्स मिळालं आहे. या प्रकरणी फेब्रुवारी २०२५ मध्ये सुनवाई होणार आहे. काय आहे प्रकरण?

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी केली बिझनेसमनची फसवणूक? कोर्टाकडून समन्स जारी; नेमकं प्रकरण काय?
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याविषयी एक महत्वाची बातमी समोर येतेय. धर्मेंद्र यांना कोर्टाकडून समन्स बजावलंय. दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टाने 'गरम धरम ढाबा' या फ्रँचायझीसंबंधित एका प्रकरणात धर्मेंद्र आणि अन्य दोघांना समन्स जारी केलंय. ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट यशदीप चहल यांच्याद्वारे हे समन्स बजावण्यात आलंय. दिल्लीतील प्रसिद्ध बिझनेसमन सुशील कुमार यांनी केलेल्या तक्रारीमुळे धर्मेंद्र यांना कोर्टाकडून हे समन्स पाठवण्यात आलंय. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.
धर्मेंद्र यांना समन्स का मिळालं?
५ डिसेंबरला आलेल्या समन्समध्ये आदेश देण्यात आलाय की, "रेकॉर्डवर उपस्थित असलेले पुरावे पाहून असं दिसतंय की आरोपींनी त्यांची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तक्रारकर्त्याला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे तक्रारकर्त्याची मोठी फसवणूक झाली आहे. त्यामुळे सीरीयल नंबर १ (धर्मेंद्र सिंह देओल) आणि अन्य २ व्यक्तींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देत आहोत. याशिवाय धमकी देण्याचा गुन्हाही त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे." २० फेब्रुवारी २०२५ ला कोर्टात या प्रकरणाची सुनवाई होईल.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार सुशील कुमार यांना एप्रिल २०१८ मध्ये आरोपींनी 'गरम धरम ढाबा' उघडण्याची ऑफर देऊन संपर्क साधला होता. कनॉट प्लेस, दिल्ली, हरियाणा अशा ठिकाणी असलेल्या 'गरम धरम ढाबा'च्या फ्रँचायझींमधून ७० ते ८० लाख रुपयांची मासिक उलाढाल होत असल्याचं आमिष सुशील कुमारला दाखवण्यात आलं. त्यामुळे सुशील यांनी या फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करावी, अशी ऑफर त्यांना देण्यात आली.
सात टक्के नफ्याच्या बदल्यात बिझनेसमन सुशील कुमार यांनी ४१ लाख रुपयांची गुंतवणूक करावी, असं त्यांना सांगण्यात आलं. याशिवाय सुशील यांना उत्तर प्रदेशात फ्रँचायझी स्थापन करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचं आश्वासनही देण्यात आलं. यासंदर्भात सुशील यांच्या आरोपींसोबत इ-मेलच्या माध्यमातून बैठकीही झाल्या. परंतु पैशांची गुंतवणूक करुनही पुढे काही प्रतिसाद न मिळाल्याने बिझनेसमन सुशील कुमार यांनी कोर्टात फसवणूक झाल्याची याचिका दाखल केली. त्यामुळे धर्मेंद्र आणि अन्य दोन व्यक्तींना कोर्टाने समन्स बजावलं आहे.