Amjad Khan Birthday Special : या कारणामुळे अमजद खान सेटवर घेऊन आले होते चक्क दोन म्हशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 15:41 IST2018-11-12T15:34:19+5:302018-11-12T15:41:22+5:30
अमजद खान हे फारच साधं जीवन जगायचे. पण त्यांना एका गोष्टीची फारच सवय होती. त्या गोष्टीशिवाय ते राहूच शकत नव्हते.

Amjad Khan Birthday Special : या कारणामुळे अमजद खान सेटवर घेऊन आले होते चक्क दोन म्हशी
अमजद खान यांचा जन्म पेशावरमध्ये १२ नोव्हेंबर १९४० ला झाला. अभिनयाचं बाळकडू अमजद खान यांना घरातूनच मिळालं होतं. त्यांचे वडील जयंत हे सिने इंडस्ट्रीत व्हिलन म्हणून काम करायचे. त्यांचे दोन्ही भाऊ म्हणजे इम्तियाज आणि इनायत खान अभिनेते होते. अमजद खान यांनी चित्रपटात येण्यापूर्वी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 'अब दिल्ली दूर नही' या सिनेमातून केली होती. या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी कुरबानी, उत्सव, माँ कसम, हिम्मतवाला, हम से बढकर कौन, मि.नटवरलाल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
१९७५ साली आलेल्या 'शोले' सिनेमाने त्यांना रातोरात स्टार केले. त्यांची शोले या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. या चित्रपटातील गब्बर सिंग ही त्यांची व्यक्तिरेखा आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या सिनेमातील 'सो जा बेटा नहीं तो गब्बर आ जाएगा' हा डायलॉग आजही तितकाच लोकप्रिय आहे. महत्वाची बाब म्हणजे अमजद खान हे गब्बरच्या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते. असे सांगितले जाते की, गब्बरच्या भूमिकेसाठी आधी डॅनी यांना विचारण्यात आलं होतं. पण काही कारणास्तत त्यांनी ही भूमिका साकारली नाही आणि हा रोल अमजद खान यांच्या पदरात पडला.
शोलेच्या मेकर्सना अमजद खान यांचा आवाज गब्बरच्या भूमिकेसाठी योग्य वाटला नव्हता. त्यामुळे त्यांना डॅनी यांना या सिनेमात घ्यायचं होतं. पण शेवटी अमजद खान यांनीच ही अजरामर भूमिका साकारली.
अमजद खान हे पडद्यावर जितके कठोर दिसायचे, त्याउलट खऱ्या आयुष्यात ते फार विनम्र होते. केवळ ते ४८ वर्षांचे असताना २७ जुलै १९९२ मध्ये त्यांचे निधन झाले. ८० च्या दशकात व्हिलन म्हणून त्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती. त्यांनी २०० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं होतं. अमजद खान हे फारच साधं जीवन जगायचे. पण त्यांना एका गोष्टीची फारच सवय होती. त्या गोष्टीशिवाय ते राहूच शकत नव्हते. ती म्हणजे चहा. अमजद खान हे चहा शिवाय राहूच शकत नव्हते. असे सांगितले जाते की, एका दिवसात ते ३० कप चहा प्यायचे. चहा त्यांची कमजोरी होती, त्यांना चहा मिळाला नाही तर ते कामही करू शकत नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार, एकदा अमजद खान हे रिहर्सलसाठी पृथ्वी थिएटरमध्ये आले होते. काम सुरू करण्याआधी त्यांनी चहा मागितला होता पण दूध नसल्याकारणाने त्यांना चहा मिळाला नाही. पण त्यांनी कोणत्याही परिस्थितीत चहा हवा होता. त्यांना चहा न मिळाल्याने ते हैराण झाले होते. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा रिहर्सलसाठी आले तेव्हा सोबत दोन म्हशी घेऊन आले होते.