सोनाक्षी सिन्हाने सडेतोड उत्तर दिल्यानंतर मुकेश खन्नांचा यु टर्न; म्हणाले, "खेद व्यक्त करतो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 10:26 IST2024-12-18T10:25:41+5:302024-12-18T10:26:18+5:30
मुकेश खन्ना म्हणाले, 'उत्तर द्यायला एवढा वेळ घेतलास याचं...'

सोनाक्षी सिन्हाने सडेतोड उत्तर दिल्यानंतर मुकेश खन्नांचा यु टर्न; म्हणाले, "खेद व्यक्त करतो..."
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) KBC शोमध्ये 'रामायण' संबंधित एका प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं होतं. यावरुन 'शक्तिमान' फेम अभिनेते मुकेश खन्नांनी (Mukesh Khanna) तिला फटकारलं होतं. तसंच तिच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यावर तब्बल ६ वर्षांनी सोनाक्षीने सडेतोड उत्तर देणारी पोस्ट दोन दिवसांपूर्वी लिहिली. तिने मुकेश खन्नांना चांगलंच सुनावलं. आता नुकतंच मुकेश खन्नांनी सोनाक्षीच्या पोस्टवर उत्तर दिलं आहे.
मुकेश खन्ना यांनी लिहिले, "प्रिय सोनाक्षी, तू उत्तर द्यायला एवढा वेळ घेतलास याचं आश्चर्य वाटतंय. मला माहितीये प्रसिद्ध करोडपती शोमधील त्या एपिसोडवरुन मी तुझ्या विरोधात बोललो. पण मी सांगू इच्छितो की तुझ्या किंवा तुझ्या वडिलांच्या (जे माझे सीनिअर आहेत आणि ज्यांच्यासोबत माझा खूप छान बाँड आहे) प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याचा माझा उद्देश नव्हता. माझा उद्देश आजच्या पिढीवर बोलण्याचा होता ज्यांना GEN Z म्हटलं जातं. हे लोक गूगल आणि मोबाईल फोनचे गुलाम झाले आहेदत. यांचं ज्ञान युट्यूब आणि विकिपीडियापर्यंतच मर्यादित आहे. माझ्यासमोर HI FI सेलिब्रिटीचं म्हणजेच तुझं उदाहरण आलं ज्याचा उपयोग मी एकंदर या पिढीविषयी बोलण्यासाठी केला होता. या पिढीला उपदेश देण्यासाठी केला होता. वडील, मुलं, मुली यांना मला सांगायचं होतं की आपल्याकडे संस्कृती, परंपरा आणि एवढा इतिहास आहे जे आजच्या प्रत्येक तरुणाला माहित असलं पाहिजे. फक्त माहित नाही तर त्यांना याचा अभिमान असला पाहिजे. इतकंच. आणि हो, मी तुझं उदाहरणं माझ्या अनेक मुलाखतींमध्ये दिलं ज्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. पॉईंट नोटेड. असं परत घडणार नाही याची खात्री देतो. काळजी घे."
खरंतर हे प्रकरण २०१९ सालचं आहे. सोनाक्षीने केबीसी शोमध्ये हजेरी लावली होती. हनुमान संजीवनी जडीबुटी कोणासाठी आणतो याचं उत्तर सोनाक्षीला येत नव्हतं. यावरुन मुकेश खन्नांनी अनेक मुलाखतींमधून तिला चांगलंच फटकारलं होतं. तिच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. इतक्या वर्षांनी सोनाक्षीने त्यावर मौन सोडलं त्यामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.