सलमानच्या 'त्या' वक्तव्यावर जेव्हा नाना पाटेकर भडकले होते, म्हणाले, "आपण फार नकली..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 13:51 IST2023-10-05T13:50:16+5:302023-10-05T13:51:05+5:30
नाना पाटेकर सध्या 'द व्हॅक्सीन वॉर'मुळे चर्चेत आहेत.

सलमानच्या 'त्या' वक्तव्यावर जेव्हा नाना पाटेकर भडकले होते, म्हणाले, "आपण फार नकली..."
दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) लवकरच 'टायगर 3' (Tiger 3) मधून जबरदस्त कमबॅक करणार आहे. सलग फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर आता टायगरच त्याचं करिअर वाचवू शकेल अशी आशा आहे. सलमान खानबॉलिवूडमध्ये सगळेच घाबरुन असतात. तो कधी चिडेल किंवा कधी काय करेल सांगता येत नाही. मात्र एक असा अभिनेता आहे जो सलमानवर चांगलाच भडकला होता.
ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर निर्बंध लावले गेले होते. तेव्हा सलमानने ते सर्व कलाकार आहेत असं म्हणत त्यांची बाजू घेतली होती. ते व्हिसा घेऊन भारतात येतात. सरकारच त्यांना व्हिसा देते. सलमानच्या या वक्तव्यावर अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) चांगलेच भडकले होते. नाना पाटेकर म्हणाले होते की, 'पाकिस्तानी कलाकार नंतर आधी आपला देश. कलाकार देशासमोर काहीच नाही. सर्वात मोठे हिरो कोण आहेत? तर ते आपले भारतीय सैनिक आहेत. त्यांच्याशिवाय दुसरा कोणीच हिरो नाही. आपण फार नकली लोक आहोत.'
ते पुढे म्हणाले होते की, 'सलमानचं म्हणणं ठीक आहे की ते कलाकार आहेत आणि सरकारने त्यांना व्हिसा दिला आहे. पण जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध होतं तेव्हा आपण वेगळे झालो पाहिजे.' नाना पाटेकर यांच्याशिवाय अजय देवगणनेही पाकिस्तानी कलाकारांवरील बॅनचं समर्थन केलं होतं.'
नाना पाटेकर सध्या 'द व्हॅक्सीन वॉर'मुळे चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्रीने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. द काश्मीर फाईल्सप्रमाणे या सिनेमाला फारसं यश मिळताना दिसत नाही.