घराणेशाहीला कंटाळून 'बॉर्डर' फेम अभिनेत्याने सोडली इंडस्ट्री; आता काय करतोय रजत बेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 15:41 IST2024-04-05T15:40:38+5:302024-04-05T15:41:09+5:30
Rajat bedi: 'कोई मिल गया' या सिनेमातून रजतचे सीन कट करण्यात आले होते

घराणेशाहीला कंटाळून 'बॉर्डर' फेम अभिनेत्याने सोडली इंडस्ट्री; आता काय करतोय रजत बेदी
बॉलिवूडमध्ये पदार्पण करणं आणि हक्काचं स्थान निर्माण करणं हा प्रवास तसा पाहायला गेलं तर बराच कठीण आहे. त्यातही जर तुम्ही आऊटसाइडर असाल तर हा प्रवास आणखीनच कठीण आणि अवघड होतो. यात अनेकांना इंडस्ट्रीतील घराणेशाहीचाही अनुभव आला आहे. सध्या सोशल मीडियावर अशा एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे ज्याने घराणेशाहीला कंटाळून इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला.
सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगलीये ती 'बॉर्डर' फेम अभिनेता रजत बेदी (rajat bedi) याची. अनेक सिनेमांमध्ये झळकलेल्या रजतने बऱ्याचदा इंडस्ट्रीत नेपोटिझ्मचा सामना केला. ज्यामुळे या प्रकाराला कंटाळून त्याने बॉलिवूडला रामराम केलं.
रजतने १९९९ मध्ये '2001' या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. परंतु, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्यानंतर तो 'ये दिल आशिकाना', 'मां तुझे सलाम', 'अब के बरस', 'जोडी नंबर 1' यांसारख्या सिनेमात काम केलं. परंतु, त्याची फारशी जादू प्रेक्षकांवर चालली नाही. इतकंच नाही तर, काही सिनेमांमधून त्याचे सीनदेखील कट करण्यात आले.
हृतिक रोशन याचा 'कोई मिल गया' हा सिनेमा २००३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रजतने नकारात्मक भूमिका साकारली होती. मात्र, या सिनेमातील त्याचे काही सीन कट करण्यात आले होते. एका मुलाखतीमध्ये त्याने याविषयी भाष्य केलं होतं. या प्रकारानंतर त्याने कलाविश्वातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
"माझ्यासोबत घडत असलेला प्रकार पाहून मी खूप खिन्न झालो होतो ज्यामुळे मी सगळं सोडून कॅनडाला निघून गेलो. माझ्या करिअरमध्ये एक वेळ अशी आली की मी हे काय करतोय असा विचार माझ्या मनात येऊ लागला आणि मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला", असं रजत म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "प्रिती झिंटासोबत माझा एक ट्रॅक होता. पण फायनल एडिटच्या वेळी तो ट्रॅक कट करण्यात आला. इतकंच नाही तर ज्यावेळी हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी मला पब्लिसिटीपासून पूर्णपणे दूर ठेवण्यात आलं आणि मला याचंच वाईट वाटलं. दरम्यान, ज्यावेळी त्याने सनी देओलसोबत काम केलं त्यावेळी त्याचे चेकही बाऊंस करण्यात आले होते", असंही तो यावेळी म्हणाला होता.
सध्या काय करतो रजत?
रजतने बॉलिवूडमधून काढता पाय घेतल्यानंतर त्याने त्याचा मोर्चा काही काळ पंजाबी सिनेसृष्टीकडे वळवला. तसंच तो कॅनडामध्येही स्थायिक झाला होता. परंतु, आता तो भारतात परतला असून पंजाबी आणि साऊथ सिनेमांमध्ये काम करत आहे. अलिकडेच तो तेलुगू फिल्म Ahimsa मध्ये झळकला होता.