Raju Srivastav: अतिप्रमाणात जीम केल्यामुळे राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू? अखेर मुलीनं केला खुलासा म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 13:15 IST2023-01-16T13:14:26+5:302023-01-16T13:15:42+5:30
२०२२ या वर्षात दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. श्रीवास्तव यांच्या जाण्यानं मनोरंजन विश्वासह देशभरात हळहळ व्यक्त झाली.

Raju Srivastav: अतिप्रमाणात जीम केल्यामुळे राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू? अखेर मुलीनं केला खुलासा म्हणाली...
२०२२ या वर्षात दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. श्रीवास्तव यांच्या जाण्यानं मनोरंजन विश्वासह देशभरात हळहळ व्यक्त झाली. राजू श्रीवास्तव यांचं कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलेलं नाही. आपल्या अनोख्या शैलीतून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमलवणाऱ्या एका हरहुन्नरी कलाकाराची अशी अचानक एग्झिट खूप मोठा धक्का देऊन गेलं. राजू श्रीवास्तव यांच्या मुलीनं आता समोर येऊन एक सविस्तर मुलाखत दिली आणि आपलं मत व्यक्त केलं. अतिप्रमाणात जीम केल्यामुळे आणि वाढलेल्या वयात क्षमतेपेक्षा अधिक जीम करणं श्रीवास्तव यांच्या मृत्यूचं कारण असल्याचा दावा केला गेला होता. यावरही श्रीवास्तव यांच्या मुलीनं स्पष्टीकरण दिलं आहे.
राजू श्रीवास्तव यांना व्यायामाची खूप आवड होती आणि न चुकता ते व्यायाम करायचे, असं त्यांची कन्या अंतरा हिनं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. "माझे वडील व्यायामाच्या बाबतीत खूप काटेकोर होते. जर जवळपास रोजच जीमला जात असत. कुठं सु्ट्टीसाठी आम्ही गेलो असलो तरी ते कुठं जवळपास जीम मिळते ते पाहायचे आणि व्यायामासाठी वेळ द्यायचे", असं अंतरानं सांगितलं.
जीमला दोषी ठरवणं योग्य नाही
"ते नक्कीच फिटनेस फ्रीक होते आणि व्यायामात जास्त रस न दाखवणाऱ्या आम्हा कुटुंबातील सदस्यांसाठीही ते प्रेरणास्रोत होते. त्यांच्यासोबत जे काही घडलं तो फक्त एक अपघात होता. ते जीममध्ये असताना हा प्रकार घडला तो फक्त योगायोग होता. पण यामुळे आपण जिमला दोष देऊ नये. स्वतःची आरोग्याची परिस्थिती यास कारणीभूत होती", असं अंतरानं सांगितलं.
वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला निरोप
राजू श्रीवास्तव यांचा जिम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ५९ वर्षांचे होते. दिग्गज कॉमेडियनच्या निधनानं चाहत्यांनाही धक्का बसला होता. राजू श्रीवास्तव यांच्या जयंतीनिमित्त कानपूर येथील घरी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी श्रीवास्तव यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आणि श्रद्धांजली वाहिली.