वरूण धवन संतापला; व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 13:29 IST2021-08-20T13:25:48+5:302021-08-20T13:29:40+5:30
वरूण धवन नाराज का ? इन्स्टास्टोरीवर वरूणने एक व्हिडीओ शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

वरूण धवन संतापला; व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारवर साधला निशाणा
कोरोना महामारीमुळे चित्रपटगृह दीर्घकाळापासून बंद आहेत. साहजिकच चित्रपटगृहांचे मालक आणि निर्माते चित्रपटगृह कधी खुली होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईसह अख्ख्या महाराष्ट्रात कोरोना निर्बंध ब--याचअंशी शिथील करण्यात आले. मॉलही उघडले. पण चित्रपटगृहांचे कुलूप मात्र अद्यापही उघडलेले नाही. काही राज्यांत 50 टक्के क्षमतेने चित्रपटगृह खुली झाली आहेत. पण महाराष्ट्रासह अनेक राज्यांत ते बंद आहेत. आता याविरोधात चित्रपटसृष्टीच्या कलाकारही नाराजी व्यक्त करू लागले आहेत. बॉलिवूड अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan ) त्यापैकीच एक. इन्स्टास्टोरीवर वरूणने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यात मुंबईतील वांद्रे भाग गर्दीने गजबलेला दिसतोय. सर्व काही सुरू असल्याचे पाहायला मिळतेय. वरूणने याच व्हिडीओचा संदर्भ देत, ‘सगळं काही सुरू आहे, मात्र चित्रपटगृह बंद का?’, असे लिहिले आहे. सोबत नाराजी व्यक्त करणारा इमोजी देखील शेअर केला आहे.
महाराष्ट्र जाहीर केलेल्या नवीन नियमावलीत शॉपिंग मॉल, जिम सारख्या ब-याच गोष्टीवरचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरात या राज्यांनी चित्रपटगृह सुरू केली आहेत. मात्र महाराष्ट्रात अजून यावर निर्बंध आहे.
भन्साळीही नाराज
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनीही चित्रपटगृह बंद असल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊननंतर सर्व काही सुरू झालेय. मग चित्रपटगृह बंद का? विमानातही लोक एकमेकांच्या शेजारी बसतात, ते चालतं मग चित्रपटगृहांबद्दलच ही भूमिका का? असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे. संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठेवाडी’ हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे.