'धूम' चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण; 'धूम'चं जग अँटी-हिरोचं - विजय कृष्ण आचार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 04:04 PM2020-08-27T16:04:51+5:302020-08-27T16:05:18+5:30

धूम चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत.

'Dhoom' completes 16 years; The world of 'Dhoom' is anti-hero - Vijay Krishna Acharya | 'धूम' चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण; 'धूम'चं जग अँटी-हिरोचं - विजय कृष्ण आचार्य

'धूम' चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण; 'धूम'चं जग अँटी-हिरोचं - विजय कृष्ण आचार्य

googlenewsNext

फिल्ममेकर विजय कृष्ण आचार्य यांची एक स्वतंत्र आणि उत्तम ओळख आहे आणि याची काही कारणेही आहेत. या लेखक-दिग्दर्शकाने भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील सगळ्यात यशस्वी फ्रँचाईझीचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारी ही सीरिज म्हणजे धूम सीरिज. त्यांना प्रेमाने या क्षेत्रात व्हिक्टर म्हटलं जातं. ते म्हणाले या यशाने त्यांना विनयशील बनवलं आहे. त्यांनी सांगितले की जगभरातील प्रेक्षकांमध्ये भन्नाट लोकप्रिय झालेल्या या फ्रँचाईझीमधील पहिल्या सिनेमाच्या यशाने ते आणि सिनेमाचे निर्माता आदित्य चोप्रा सकारात्मक अर्थाने आश्चर्यचकित झाले होते.

आमिर खानच्या धूम :3 चे दिग्दर्शन करण्याआधी व्हिक्टर यांनी पहिल्या दोन सिनेमांसाठी लेखन केले आहे. ते म्हणाले, "प्रामाणिकपणे सांगायचं तर लेखक म्हणून प्रत्येकालाच कौतुक आवडते. पण, मी यातील व्यावसायिक बाबतींमध्ये अनभिज्ञ होतो. मला वाटतं प्रत्येक सिनेमा आधी एक सर्जनशील प्रयत्न असतो आणि व्यवहार हे त्यातून येणारे बायप्रोडक्ट आहे. पण, या सिनेमाला (पहिला धूम) मिळालेला प्रतिसाद पाहून आम्हाला आश्चर्याचा, आनंदाचा धक्का बसला होता."



ते पुढे म्हणाले, "पटकथेच्या पातळीवरच आम्हाला विश्वास मिळाला होता की हा सिनेमा मनोरंजक असणार आहे. या सिनेमाने स्वत:ला फारसं गांभीर्याने घेतलं नाही आणि कदाचित हीच गोष्ट आणि त्यातील अॅक्शनची ऊर्जा आणि अर्थातच प्रीतमचे धूम मचा ले हे गाणे तरुण प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेले. या सिनेमाचे सिक्वेल बनू शकतील असा अंदाज असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आदि. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधीच त्याने मला ईमेल केला  आणि सिक्वेलबद्दल विचार करण्यास सूचवले"

धूमच्या वर्षपूर्तीसोबतच व्हिक्टर यांनी वायआरएफ आणि यश चोप्रा यांच्यासोबत 16 वर्षांची कारकिर्द पूर्ण केली आहे. या स्टुडिओसोबतच्या सर्जनशील सहकार्याबद्दल ते म्हणाले, “माझ्यासाठी हे सगळं कालच घडल्यासारखं आहे. माझ्यासाठी मला भेटणारी माणसं आणि त्यातून निर्माण होणार नाती महत्त्वाची असतात. धूमसाठी लिखाण करत असतानाच मला आदिमध्ये विविध कल्पना आणि निर्मितीसाठीचा योग्य सहकारी दिसला. तो खऱ्या अर्थाने एक सर्जनशील निर्मात आहे. तो लिहितो आणि दिग्दर्शनही करतो. त्यामुळे या सर्जनशील प्रक्रियेतील आव्हानांची त्याला कल्पना आहे आणि दिग्दर्शकाला त्याची कल्पना जीवंत करून दाखवायची असते, हे त्याला कळतं. सगळीकडे जीवघेणी स्पर्धा, खेचाखेच असताना त्याने शांततेचं एक वेगळं विश्व निर्माण केलं आहे.”



नैतिकता असलेला खलनायक असणे ही व्हिक्टर यांची कल्पना नवी होती. कारण, इथे दरवेळी खलनायक जिंकतो. ते म्हणाले, "धूमचं जग अँटी-हिरोचं आहे. पारंपरिक पद्धतीच्या खलनायकाचं नाही. पहिल्या धूममध्ये हा अँटी-हिरो बंडखोर होता. तो चोर असला तरी त्याचं एकूण व्यक्तीमत्त्व बंडखोराचं होतं. तारुण्याचा उत्साह, बाईक्स, एनर्जी... हे सगळं ठरवून केलेलं नव्हतं. ते सगळं आपोआप येत गेलं... मला वाटतं अंत:प्रेरणेने. बँक लुटणारे एक योजना आखताहेत हा सर्व धूम सिनेमांमधील समान धागा नकळतपणे जोडला गेला."

ते पुढे म्हणाले, "यातला हिरो हा अँटी-हिरो आहे आणि तो सूज्ञपणा आणि नियमांच्या पारंपारिक चाकोरीतून पलिकडे जाऊ पाहतो. तो समाजाच्या स्तराचा एक भाग असला तरी तो त्याबाहेरचा आहे (धूम:2), जरा धूममधला कबीर आणि धूम:3 मधला साहीर. प्राणघातक अशा अनेक प्रसंगांना सामोरे जाण्यातील त्यांच्या अतुलनीय क्षमता आणि धाडस यामुळे ते सामान्य माणसापेक्षा वेगळे ठरतात."

वाढलेल्या अपेक्षांमुळे धूम फ्रँचाईझीचे दिग्दर्शन करणे हा आनंद होता आणि ताण असे आता विचारले तर व्हिक्टर म्हणतात, "फिल्ममेकिंग हा आनंद आणि ताण यांचा कधी छान तर कधी त्रासदायक मेळ असतो. सर्व धोकादायक गोष्टींमध्ये एक अनोखे साहस आणि आकर्षण यांचा मेळ असतो. इथेही अगदी तसेच असते.

त्यामुळे हो, ही नेहमीच आनंदाची बाब असेल मात्र मला याची कल्पना आहे की प्रत्येक सिनेमासोबत हे काम अधिक कठीण होत जाणार कारण दरवेळी यातला गाभा नव्याने शोधावा लागेल, निर्माण करावा लागेल. असे म्हणताना मला आठवतं की धूम:2 ची पटकथा लिहित असताना आदि एकदा म्हणाला होता की आपण फक्त फ्रँचाईझी करायची म्हणून धूम बनवू नये. हा सिनेमा धूम असो किंवा नसो... आपण कोणत्याही परिस्थितीत तो बनवलाच असता, असं वाटत असेल तरच तो बनवायचा. मला वाटतं अजून तरी मी या तत्वाशी प्रामाणिक आहे."

Web Title: 'Dhoom' completes 16 years; The world of 'Dhoom' is anti-hero - Vijay Krishna Acharya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.