"नुसते कायदे कडक असून चालत नाही..." बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी तेजस्विनीचा एकच सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 13:15 IST2024-08-21T13:11:19+5:302024-08-21T13:15:41+5:30
अभिनेत्री तेजस्वी पंडितने सोशल मीडियाच्या माध्यमातून बदलापुरात घडलेल्या निंदनीय घटनेचा निषेध केला आहे.

"नुसते कायदे कडक असून चालत नाही..." बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी तेजस्विनीचा एकच सवाल
Tejaswini Pandit On Badlapur Case : बदलापुरातील एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाला. त्या घटनेचा निषेधार्थ मंगळवारी बदलापुरमध्ये नागरिकांमध्ये असंतोषाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संतप्त बदलापुरकर रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रेल रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. या घडल्या प्रकारामुळे महाराष्ट्रभर एकच खळबळ माजली. त्यावर आता वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळींही या घटनेवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केला आहे.
अभिनेत्री तेजस्वी पंडित तिच्या परखड आणि बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय मुद्यांवर भाष्य करत असते. दरम्यान, तेजस्विनीने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीच्या माध्यमातून तिने बदलापुरात घडलेल्या निंदनीय घटनेचा निषेध केला आहे.
या स्टोरीमध्ये तेजस्विनी पंडितने म्हटलंय, "बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार करणाऱ्याला जातपात, धर्म नसतो. फक्त वृत्ती असते तिच ठेचली पाहिजे. ज्यासाठी जाच बसणं गरजेचं आहे. नुसते कायदे कडक असून चालत नाही, ते आपल्याकडे आहेतच. अंमलात कधी आणायचे?" असा थेट सवाल तिने प्रशासनाला विचारला आहे.
पुढे अभिनेत्रीने लिहलंय, "सगळ्यांना मनापासून विनंती, कृपया बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याचं कुठल्याही पद्धतीने राजकारण करू नये". असं म्हणत तिने #निषेध #Lawandordernoticeplace असे टॅग देत स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
बदलापुरात नेमकं काय घडलं?
बदलापुरातील एका शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या शाळेतील सफाई कामगाराने १२ आणि १२ ऑगस्टला अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर पीडित मुलींच्या आईला पोलीस ठाण्याच्या परिसरातच १२ तास उभे करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे बदलापुरकरांच्या रागाचा उद्रेक झाला.