"दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध
By मयुरी वाशिंबे | Updated: April 24, 2025 16:34 IST2025-04-24T16:30:24+5:302025-04-24T16:34:14+5:30
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

"दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध
Lalit Prabhakar on Terror Attack: मराठी कलाक्षेत्रातला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर (Lalit Prabhakar). छोट्या पडद्यावरून त्याने अभिनयाची सुरवात केली. त्यानंतर हळूहळू मराठी सिनेमा आणि मग वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. आता तो थेट बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'ग्राउंड झिरो' (Ground Zero) चित्रपटात तो लष्करी अधिकाऱ्याची भूमिका बजावतोय. काश्मीरमधील दहशतवादी कारवायांवर आधारित हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले असताना आता पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा निषेध व्यक्त ललित प्रभाकरने मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली.
ललित प्रभाकर याने नुकतंच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी त्यानं पहलगाम हल्ल्याचा सबंध हा धर्माशी जोडू नये असं म्हटलं. "दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" अशी प्रतिक्रिया त्याने दिली. पहलगामच्या घटनेवर आपला संताप व्यक्त करत तो म्हणाला, "खूपच वाईट घटना घडली. कुठल्याही निशस्त्र माणसांवर हल्ला करणं हे भ्याडपणाचं उदाहरण आहे. कुठल्याच धर्मात म्हटलेलं नाही की आपण निशस्त्र लोकांवर हल्ला करावा. या पद्धतीची घटना ही गालबोट लावणारी आहे".
पुढे तो म्हणाला, "यामुळे कश्मीरमधील लोकांचं मोठं नुकसान होणार आहे. कारण, याचा पर्यटनावर परिणाम होईल. हे खूप दु:खद आहे. याच्यावर काहीतरी तोडगा काढला जावा आणि प्रत्युत्तर आपण आपल्याबाजून दिलं गेलं पाहिजे. मला वाटतं नाही का आपण यामध्ये जातीचं, धर्माचं राजकारण करावं. त्या लोकांनी जे केलं ते चुकीचं होतं. पण, मला वाटतं नाही की आपण त्याचा कुठल्या जातीशी, धर्माशी त्याचा संबंंध जोडावा. ते कुठल्याही धर्माचे असो, ज्यांनी कुणी हे केलं, ते चुकीचं होतं आणि त्यांना याची शिक्षा मिळाली पाहिजे", या शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, ललितचा 'ग्राउंड झिरो' हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतरच्या सिक्रेट मिशनवर आधारित हा चित्रपट आहे. सिनेमात इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा लष्करी अधिकाऱ्याची भूमिका बजावत आहे तर, सई ताम्हणकर (Sai Tamhankar ) यामध्ये जवानाच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.