"त्यामुळे चित्रपट चालत नाहीत...", अशोक सराफ यांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले-"एक चित्रपट हिट झाला की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:55 IST2025-04-07T10:53:21+5:302025-04-07T10:55:02+5:30
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

"त्यामुळे चित्रपट चालत नाहीत...", अशोक सराफ यांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले-"एक चित्रपट हिट झाला की..."
Ashok Saraf: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 'अशी ही बनवाबनवी', 'धूमधडाका','नवरा माझा नवसाचा' अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अशोक सराफ यांचे सिनेमे प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात. याशिवाय काही चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी निभावलेल्या गंभीर भूमिकाही चांगल्याच गाजल्या. सध्या ते त्यांच्या ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'राजकमल एंटरटेनमेंट’चा हा नवाकोरा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात भेटीला येणार आहे. अशातच आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांनी सध्याच्या चित्रपटांबद्दल भाष्य केलं आहे.
नुकतीच अशोक सराफ यांनी 'प्लॅनेट मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, " सध्याच्या चित्रपटांमध्ये मुळात कंन्टेंट मिसिंग आहे हीच गोष्ट खरी आहे. आताचे चित्रपट बनवताना आपण काय करतो याकडे लक्षच दिलं जात नाही. एक रॅट रेस सुरु झाली आहे. एक चित्रपट हिट झाला की त्याचसारखे चित्रपट तयार करायचे असं चाललं आहे. त्यामुळे चित्रपट चालत नाहीत. पहिला चित्रपट हिट झाला म्हणून दुसरा होईलच असं सांगता येत नाही. चित्रपट पाहून लोकं आकर्षित झाली पाहिजेत. चित्रपटांमध्ये लोकांना पटण्यासारखं काहीतरी वाटलं पाहिजे, तरच चित्रपट चालतात. पण, तसा कंन्टेंट सापडत नाही." असं स्पष्ट मत अशोक सराफ यांनी मांडलं.
दरम्यान, 'अशी ही जमवा जमवी' या सिनेमात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या अनुभवी कलाकारांसोबत सिनेमात सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे अशा लोकप्रिय कलाकारांची फौज आहे.