"खूप कठीण काळ..."; अपघातानंतर पाय कापण्याची वेळ; 'या' अभिनेत्याच्या ३ वर्षांत झाल्या २३ सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 06:06 PM2024-09-26T18:06:02+5:302024-09-26T18:37:56+5:30

एका भयंकर अपघाताने अभिनेत्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं आणि तीन वर्षे तो अंथरुणाला खिळून राहिला.

बॉलिवूड असो की साऊथ इंडस्ट्री, आज सुपरस्टार बनलेल्या कलाकारांनी अनेक संघर्षमय दिवसांचा सामना केला आहे. तमिळ सिनेमातही असाच एक सुपरस्टार आहे. ज्याला चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी दहा वर्षे लागली.

एका भयंकर अपघाताने अभिनेत्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं आणि तीन वर्षे तो अंथरुणाला खिळून राहिला. हा अभिनेता म्हणजे चियान विक्रम, जे साऊथ सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे.

अभिनेत्याच्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा तो खूप वाईट दिवसांमधून गेला. एकदा त्याचा भीषण अपघात झाला, त्यानंतर त्याचा पाय कापण्याची वेळ आली होती. या अभिनेत्यावर २३ सर्जरी कराव्या लागल्या आणि त्यानंतरच तो आपल्या पायावर उभा राहू शकला.

'थंगालन' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीर अलाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत चियान विक्रमने त्याच्यासोबत घडलेल्या या अपघाताविषयी मोकळेपणाने संवाद साधला होता.

अभिनेता म्हणाला, "हा एक वाईट अपघात होता, खूप कठीण काळ होता. जेव्हा ते मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तेव्हा त्यांना माझा पाय कापायचा होता. ते खूप वाईट होतं कारण कापलं गेलं असतं तर कदाचित रक्तस्त्राव झाला असता. पण कापलं गेलं नाही माझी हाडं मोडली होती."

"'माझा पाय सुजला होता. सरकारी दवाखान्यात काय करावं हे त्यांना कळत नव्हतं, ते म्हणाले चला त्याचा पाय कापून टाकू. त्या दिवसांत तुमच्यासोबत कोणताही अपघात झाला की पोलीस केस व्हायची. त्यामुळे त्या व्यक्तीला सरकारी रुग्णालयात घेऊन जावं लागायचं."

"माझा पाय कापण्यासाठी त्यांच्याकडे टूल्स नव्हते. त्यामुळे मला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथे काहीतरी चमत्कारिक घडलं. तीन वर्षे अंथरुणाला खिळलेला असताना २३ सर्जरी कराव्या लागल्या."

अपघातानंतर पाच वर्षांनंतर जेव्हा तो बरा झाला तेव्हा तो त्याच डॉक्टरकडे गेला ज्यांनी त्याचा पाय कापण्याचा सल्ला दिला होता. चियान विक्रम आपल्या पायावर उभा असल्याचं पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं.

चियान विक्रमने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत.