Savita damodar paranjpe Review : अंगावर शहारा आणणारा चित्रपट
By प्राजक्ता चिटणीस | Updated: August 8, 2023 19:28 IST2018-08-31T15:29:01+5:302023-08-08T19:28:38+5:30
सविता दामोदर परांजपे या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, सविता प्रभुणे, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Savita damodar paranjpe Review : अंगावर शहारा आणणारा चित्रपट
प्राजक्ता चिटणीस
सविता दामोदर परांजपे हे नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकाला आज अनेक वर्षं झाले असले तरी हे नाटक आजही रसिकांच्या स्मरणात आहे. सविता दामोदर परांजपे हा चित्रपट याच नाटकावर बेतलेला असल्याने या चित्रपटाकडून रसिकांच्या खूप अपेक्षा आहेत. माध्यमांतर करताना मूळ कथेत काही बदल करण्यात आले असले तरी हा चित्रपट आपली नक्कीच निराशा करत नाही.
शरद अभ्यंकर (सुबोध भावे) आणि कुसूम (तृप्ती तोरडमल) यांचे सुखी जोडपे असते. पण कुसूम सतत आजारी पडत असते. अनेक उपचार करून देखील तिची तब्येत बरी होत नसते. त्यामुळे शरद ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यायचे ठरवतो आणि अशोक (राकेश बापट) ला घरी बोलावतो. कुसूमला पाहाताच क्षणी तिला कोणीतरी झपाटले असल्याचे त्याच्या लक्षात येते. तिचा हात बघत असताना तू कोण आहेस असे तो तिला विचारतो, यावर मी सविता दामोदर परांजपे असल्याचे ती सांगते. कुसूमच्या शरीरात सविताचा वास अनेक वर्षांपासून असतो. पण याची कल्पना कोणालाच नसते. पण अशोक घरात आल्यानंतर कुसूमच्या अंगात असलेली सविता सगळ्यांना सतवायला सुरू करते. तिच्या मागण्या अशोक पुढे ठेवते. ही सविता दामोदर परांजपे कोण आहे? तिचा कुसूम आणि अविनाशच्या आयुष्याशी काय संबंध आहे? ती त्यांच्या आयुष्यातून दूर जाते का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.
सविता दामोदर पराजंपे या चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासूनच चित्रपटाची कथा चांगलीच पकड घेतो. चित्रपटात आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहाते. चित्रपटाचे बँकराऊंड स्कोर, सिनेमेटोग्राफी मस्त जमून आली आहे. चित्रपट पाहाताना कथेतील भयाणपणा आपल्याल नक्कीच जाणवतो. सुबोध भावे, राकेश बापट यांनी चित्रपटात खूप चांगले काम केले आहे. तृप्तीचा हा पहिलाच चित्रपट असला तरी तिने कुसूम आणि सविता या दोन्ही व्यक्तिरेखा तितक्याच ताकदीने उभ्या केल्या आहेत. मध्यांतरापर्यंत कथेतील उत्सुकता शिगेला पोहोचते. पण मध्यांतरानंतर चित्रपट उगाचच ताणल्यासारखा वाटतो. चित्रपटाच्या शेवटी उगाचच मेलोड्रामा टाकण्यात आला असल्यासारखे जाणवते. तसेच शेवट मनाला पटत नाही. पण एकंदरीत हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन नक्कीच करतो.