"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:35 IST2025-04-24T15:34:02+5:302025-04-24T15:35:03+5:30
Shatrughan Sinha On Pahalgam Attack : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत मीडियावर ताशेरे ओढले आहेत.

"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
Shatrughan Sinha On Pahalgam Attack : पहलगाम आतंकवादी हल्ल्यात तब्बल २८ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. सामान्य जनतेसोबतच दिग्गज कलाकार देखील या घटनेचा निषेध करताना दिसत आहेत. शाहरुख खान, सलमान खान यांच्यासह अनेक कलाकारांनी या घटनेवर आपला राग व्यक्त केला आहे. दरम्यान, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत मीडियावर ताशेरे ओढले आहेत.
शत्रुघ्न सिन्हा यांना जेव्हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते संतापले आणि म्हणाले की, “सारखं हिंदू-हिंदू का म्हणत आहात? तिथे हिंदू आणि मुस्लिम सगळेच भारतीय आहेत. हा गोदी मीडिया उगाचच गरजेपेक्षा अधिक हे चालवत आहे. हा प्रपोगंडा वॉर आमचे मित्र माननीय पंतप्रधान मोदीजी आणि त्यांच्या गटाकडून सुरू आहे.”
शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की, “मला माहीत आहे की, हा एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. या सगळ्याचा खूप खोलवर विचार केला गेला पाहिजे. या काळात आपण असे काहीही बोलू नये किंवा करू नये, ज्यामुळे तणाव वाढेल. सध्या या जखमांवर फुंकर घालण्याची, मलम लावण्याची गरज आहे.”
नेटकरी संतापले!
शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहींनी या प्रकारणात सोनाक्षीच्या लग्नाचा मुद्दा देखील खेचला आहे. एका युजरने कमेंट करत म्हटले की, ‘जर सगळेच भाऊ भाऊ आहोत, तर त्यांनी केवळ हिंदू विचारूनच गोळ्या का मारल्या? सगळ्यात आधी तर आपण अशा लोकांना धडा शिकवायला हवा, जे आपले असून देशद्रोह करतात.’
भ्याड हल्ल्यात निष्पापांचा बळी
२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन घाटीत आतंकवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून, गोळ्या मारून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेत अनेक निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. तर, काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. या आतंकवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाची संघटना असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) स्वीकारली. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून, केवळ हिंदू असणाऱ्यांनाच गोळ्या घातल्याने आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे.