"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:57 IST2025-04-18T12:57:25+5:302025-04-18T12:57:42+5:30
Renuka Shahane : रेणुका शहाणे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हल्लीच्या मालिकांवर मत व्यक्त केले आहे.

"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. नुकतीच त्यांची दुपहिया ही वेबसीरिज भेटीला आली. त्यानंतर आता त्यांचा देवमाणूस (Dev Manus Movie) हा सिनेमा भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत महेश मांजरेकर मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान एका मुलाखतीत सध्याच्या मालिकांवर भाष्य केले आहे.
रेणुका शहाणे यांनी मराठी सिनेइंडस्ट्रीतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मालिकेतही काम केले. नुकतेच त्यांनी 'कॅचअप' युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यात त्यांनी सध्याच्या मालिकांवर आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या की, ''आपलं टेलिव्हिजन त्या काळातलं खूपच पुरोगामी आणि खूप वेगळ्या विचारांचं होतं. सगळ्यांमध्ये जी व्यक्तिरेखा होती ती खूपच वेगळी आणि सशक्त अशी होती.''
''मला हे कुठेतरी चुकीचं वाटतंय''
''आजही मला अशा भूमिका येतात डेलीज मधल्या की तू अशी अशी सासू जी सूनेला खूप प्रताडीत करते आणि आता कसं जमणार ते मला? आणि आपण सगळे म्हणजे आम्ही तर बायका आहोत. तर आम्ही अशा गोष्टी का दाखवू इच्छितो जिथे म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा तिने म्हणजे वाट्टेल ते सहन करून मूल्य टिकवली पाहिजेत. बाकी कोणी नाही टिकवली तरी चालेल.. असं कसं आपण २४ तास आपल्या मुलींना सांगतोय हे टेलिव्हिजनद्वारे. तर हे मला कुठेतरी चुकीचं वाटतंय'', असे रेणुका शहाणे मुलाखतीत म्हणाल्या.