अल्लू अर्जुनला बेल की जेल? न्यायालयाने राखून ठेवला निर्णय, 'या' दिवशी येणार निकाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 21:27 IST2024-12-30T21:24:50+5:302024-12-30T21:27:38+5:30
Sandhya Theater Stampede Case: संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.

अल्लू अर्जुनला बेल की जेल? न्यायालयाने राखून ठेवला निर्णय, 'या' दिवशी येणार निकाल...
Sandhya Theater Stampede Case: पुष्पा-2 चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि टॉकिज मॅनेजमेंटच्याविरुद्ध चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे अडचणीत आलेल्या अल्लू अर्जुनच्या जामीन अर्जावर आज (30 डिसेंबर) न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून, 3 जानेवारीला अल्लू अर्जुनचे भवितव्य ठरणार आहे.
अल्लू अर्जुनची अटक आणि जामीन
अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती, तर 14 डिसेंबर रोजी तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. 27 डिसेंबर रोजी अभिनेता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर झाला होता. दरम्यान, आता नियमित जामिनासाठी अभिनेत्याच्या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला आहे.
संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली
4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान ही घटना घडली. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली.चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला.
तेलंगणा पोलिसांचा दोष नाही- पवन कल्याण
अल्लू अर्जुनवरील कारवाईबाबत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण म्हणाले की, अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. अशा घटनांमध्ये पोलिस सुरक्षेचा विचार करून काम करतात. मात्र, थिएटर कर्मचाऱ्यांनी अल्लू अर्जुनला परिस्थितीची आधीच माहिती द्यायला हवी होती. अल्लु अर्जुननेही चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना आधी भेटायला हवे होते, असे पवन कल्याण म्हणाले.