तमीळ चित्रपटसृष्टीचा सूर हरपला! गायिका उमा रामनन यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 14:52 IST2024-05-02T14:52:21+5:302024-05-02T14:52:38+5:30
तमीळ गायिका उमा रामानन (Uma Ramanan) यांचे दीर्घ आजारपणामुळे निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या.

तमीळ चित्रपटसृष्टीचा सूर हरपला! गायिका उमा रामनन यांचं निधन
तमीळ गायिका उमा रामानन (Uma Ramanan) यांचे दीर्घ आजारपणामुळे निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या. १ मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या ३० वर्षांपासून त्यांनी आपल्या सुरेल स्वरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. अद्याप त्यांच्या निधनाचे अद्याप कारण समोर आलेले नाही. त्यांच्या निधनामुळे साऊथ सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
उमा रामानन तमीळ सिनेइंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. त्यांच्या निधनानंतर साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी चेन्नईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार कधी होणार हे अद्याप समजू शकलेले नाही. उमा रामानन यांनी १९७७ साली श्री कृष्ण लीला सिनेमात पहिल्यांदा गाणं गायलं होतं.
उमा रामानन यांनी पजानी विजयलक्ष्मी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरविले आहेत. यादरम्यान त्यांची एवी रामानन यांच्यासोबत भेट झाली. ते त्यांच्या इव्हेंट कंपनीसाठी टॅलेंटेड गायिकेच्या शोधात होते. उमा यांच्या गायनाने एवी प्रभावित झाले होते. त्यानंतर एवी रामानन आणि उमा यांच्यात जवळीक वाढत गेली. शेवटी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
६००० हून जास्त संगीत कार्यक्रमात घेतला भाग
उमा रामनन या प्रशिक्षित गायिका होत्या आणि ३५ वर्षांत त्यांनी ६००० हून अधिक मैफिलींमध्ये भाग घेतला होता. जेव्हा त्या त्यांचे पती आणि संगीतकार ए.व्ही. रामनन यांना भेटल्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या मैफिलीसाठी सहयोग करण्यास सुरुवात केली. उमा यांनी पतीसाठी अनेक गाणी गायली असली तरी तमिळ चित्रपट 'निझलगल'मधील उमा रामनन यांच्या 'पूंगाथावे थाल थिरावई'मधून लक्ष वेधून घेतले. यामुळे त्यांच्या कारकिर्दीला अत्यंत आवश्यक ओळख मिळाली आणि त्यांनी इलैयाराजासोबत १०० हून अधिक गाण्यांमध्ये काम केले. इलैयाराजा व्यतिरिक्त त्यांनी विद्यासागर, मणि शर्मा आणि देवा या संगीतकारांसाठीही गाणी गायली.