"सुख म्हणजे काय असतं'च्या सेटवर बिबट्याची एंट्री, निर्माता आदिनाथ कोठारे म्हणाला-रात्रीच्या वेळी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 09:36 IST2023-07-29T09:13:03+5:302023-07-29T09:36:18+5:30
'सुख म्हणजे काय असतं' च्या सेटवर बिबट्या शिरला तेव्हा सेटवर २०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते.

"सुख म्हणजे काय असतं'च्या सेटवर बिबट्याची एंट्री, निर्माता आदिनाथ कोठारे म्हणाला-रात्रीच्या वेळी....
नुकताच मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीत मराठी मालिका 'सुख म्हणजे काय असतं' च्या सेटवर बिबट्याने एंट्री घेतली होती. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर काहीच दिवसांपूर्वी बालकलाकार मायरा वायकुळची हिंदी मालिका 'नीरजा' च्या सेटवर बिबट्या आल्याने खळबळ माजली होती. यामुळे फिल्मसिटीमध्ये काम करणाऱ्या कलाकार, कर्मचाऱ्यांच्या मनात भीती असल्याचं दिसतंय.
गोरेगावच्या फिल्मसिटीत अनेक मालिका आणि सिनेमांचं शूटिंग सुरु असतं. प्रत्येक सेटवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर जवळच संजय गांधी नॅशनल पार्क असल्याने काही वर्षांपासून इथे बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे क्रू मेंबर्समध्ये भीतीचं वातावरण आहे. मराठी मालिका 'सुख म्हणजे काय असतं' च्या सेटवर बिबट्या शिरला तेव्हा सेटवर २०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते.
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता म्हणाले, 'गेल्या १० दिवसात तिसऱ्यांदा की चौथ्यांदा ही घटना घडली आहे. २०० पेक्षा जास्त लोक सेटवर होते. यातल्या कोणाचाही जीव गेला असता. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.'
यावर आता 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकचा निर्माता आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची प्रतिक्रिया समोर आली आहे. आदिनाथ म्हणाला, या घटनेनंतर सेटवरील सेक्युरिटी गार्ड्सच्या संख्येत वाढ केली आहे. रात्रीच्या वेळी लाइट्सच्या सख्यंतेही वाढ केली आहे. साधारपणपणे मालिकेचे शूटिंग हे सकाळी ९ ते रात्री ९ असं चालतं. पण शूटिंगचे तास वाढले किंवा रात्री उशिरापर्यंत शूटिंग चाललं तर त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं विशेष काळजी घेतली जाते.