"लोकांची मानसिकता तीच आहे ती बदलणार नाही", संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर मराठी अभिनेत्याचं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:42 IST2025-03-27T11:39:29+5:302025-03-27T11:42:20+5:30
विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' चित्रपट या २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

"लोकांची मानसिकता तीच आहे ती बदलणार नाही", संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर मराठी अभिनेत्याचं भाष्य
Ankur Wadhave Post : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'छावा' चित्रपट या २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाप्रमाणे त्यातील कलाकारांच्या अभिनयाचंही सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. दरम्यान, छावा मुळे गेल्या काही दिवसांपासून मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) प्रचंड ट्रोल होत आहे. चित्रपटाच्या यशानंतर संतोष जुवेकरने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने छावा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, अक्षय खन्नाला औरंगजेब समजून त्याच्याशी संवाद साधला नसल्याचे वक्तव्य केलं. अभिनेत्याच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं. त्यामुळे आता मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी त्याच्या बाजून बोलण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता 'चला हवा येऊ द्या' मधील अंकुर वाढावे (Ankur Wadhave) याने शेअर केलेली पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
अकुंर वाढवेने आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्याद्वारे संतोष जुवेकरला ट्रोल करणाऱ्यांना धारेवर धरलं आहे. या दरम्यान, या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय, "२९९ रुपयांमध्ये 2GB Data आपल्याला मिळतो म्हणून आपण जग हातात घेउन फिरतो. पण त्याचा उपयोग कसा करायचा हे मात्र आपण अजून शिकलो नाही. एक तर कुठल्याही अभिनेत्याचं आयुष्य हे जरा किचकटच असतं कारण, आपल्याला हवं तसं काम मिळत नाही, मिळालं तर त्यातून आपलं घर कसं वाचायचं यापासून तर अनेक गोष्टी डोक्यात असतात बरं हे क्षेत्र आम्ही स्वतः निवडलं असतं त्यामुळे याचा आम्ही कोणावरही दोष देत नाही. गेल्या काही दिवसापासून संतोष जुवेकर हे ज्याप्रमाणे ट्रोल होत आहेत आणि त्या नंतर लगेच दुसरा विषय म्हणजे कुणाल कामरा! त्याने त्याच मत मांडलं. संतोष जुवेकर आणि मी तसे एकमेकांच्या एवढे जवळचे नाही पण एकाच क्षेत्रात काम करतो म्हणून आम्ही एकमेकांना ओळखतो. कुशल दादाचे ते चांगले मित्र म्हणून त्यांच्या काही गोष्टी कळल्यावर मी जरा चकित झालो जसे एकतारा त्यावेळी त्यांनी संगीत शिकायला घेतलं पात्र खरं वाटावं म्हणून खूप सारे वाद्य विकत घेतले शिकण्यासाठी पण आपल्याच मराठी प्रेक्षकांमुळे तो चित्रपट आपटला, हेच काय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अगदी जवळचा आणि अभिनेता म्हणून आपल्याला सिद्ध करण्यासाठी केलेला चित्रपट विदुषक कमाल चित्रपट अप्रतिम काम पण तोही आपटला कारण प्रेक्षकांना त्यांना असं पाहण्याची सवय नव्हती."
पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "असो तर विषय संतोष जुवेकर! त्या इंटरव्ह्यूमध्ये जे काही बोलले त्याबद्दल जास्त बोलणार नाही त्यावर खूप लोकं आपापल्या पद्धतीने बोलले! त्यानंतर लोकांनी जे त्यांना धारेवर धरलं त्यावर खूप दिवसापासून बोलायचे होते, आज बोलतोच! तर मार्वलचा बॅड मॅन सगळ्यांनी बघितला असेलच त्यातला जोकर (हीथ लिजेर) बॅड मॅन पेक्षाही लोकांना जास्त आवडला त्याने त्या पात्रासाठी स्वतःला एक वर्ष म्हणे डांबून घेतलं होतं, चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी स्वतः सांगितलं ह्या साठी मला ऑस्कर मिळेल पण मी ते घ्यायला मी नसेन आणि झालंही तसंच त्याने कारण पात्र खरं वाटण्यासाठी जे काही त्याने केलं त्यातून तो बाहेर येऊ शकला नाही आणि त्याने आयुष्य संपवून घेतलं (ऐकिव महिनुसार). जुवेकर म्हणाले अक्षय खन्नाला मी बोललो नाही ही खरं तर स्थानालावस्कीची ॲक्टिंग पद्धत आहे जी जगातले वास्तववादी अभिनेते जे आपल्याला आवडतात त्यातले जवळ्पास सगळे ही पद्धत वापरतात त्यानेही कदाचित वापरली असेल हरकत नाही. दुसरं स्टेटमेंटबद्दल मलाही हसायला आलं पण त्यावरून एवढं ट्रोल करण जरा मला खटकलं कारण त्यावरून त्याला होणारा मानसिक त्रास हे त्यालाच माहीत!"
लोकांची मानसिकता तीच आहे ते बदलणार नाही!
"संतोष दादा लोकांना काहीही म्हणू दे पण तुम्ही खंबीर राहा, धीर धरा याचा त्रास करून घेऊ नका आणि आपलं काम करात राहा! लहानपणी माझ्या उंचीवरून चिडवणारे आणि आताही, लोकांची मानसिकता तीच आहे ते बदलणार नाही! - अंकुर रंजनाबाई विठ्ठलराव वाढवे, यावरही बोलायला मागे राहणार नाहीत."
वर्कफ्रंट
अंकुर वाढवेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, चला हवा येऊ द्या या तसेच 'सर्किट हाऊस', 'कन्हैया', 'आम्ही सारे फर्स्ट क्लास', 'गाढवाचं लग्न', 'निम्मा शिम्मा राक्षस', 'करून गेलो गाव' आणि 'वासुची सासू' या नाटकांमध्ये त्याने काम केलं आहे.