स्मिता शेवाळेची 'मुरांबा' मधून एक्झिट, सहकलाकारांना निरोप देताना झाली भावूक; कारणही सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 12:20 PM2024-06-11T12:20:23+5:302024-06-11T12:21:58+5:30
स्मिता शेवाळेने मालिकेत जान्हवी ही भूमिका साकारली. तिने मालिका सोडण्याचं नेमकं कारण सांगितलं आहे.
![marathi actress Smita Shewale exit from Muramba Serial reveals reason behind it | स्मिता शेवाळेची 'मुरांबा' मधून एक्झिट, सहकलाकारांना निरोप देताना झाली भावूक; कारणही सांगितलं marathi actress Smita Shewale exit from Muramba Serial reveals reason behind it | स्मिता शेवाळेची 'मुरांबा' मधून एक्झिट, सहकलाकारांना निरोप देताना झाली भावूक; कारणही सांगितलं](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/smita-shewale-1106_2024061247191.jpg)
स्मिता शेवाळेची 'मुरांबा' मधून एक्झिट, सहकलाकारांना निरोप देताना झाली भावूक; कारणही सांगितलं
स्टार प्रवाह वरील 'मुरांबा' ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली आहे. यातील रमा-अक्षयची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. मालिकेतील इतरही कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. अभिनेत्री स्मिता शेवाळेने (Smita Shewale) मालिकेत जान्हवी ही भूमिका साकारली. तिचं हे पात्र चाहत्यांना खूपच आवडलं. पण आता अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्याने अनेकांना धक्काच बसला आहे. स्मिताने तिच्या युट्यूब व्हिडिओवरुन मालिका सोडण्याचं नेमकं कारण सांगितलं आहे.
स्मिता शेवाळेचं स्वत:चं युट्यूब चॅनल आहे. यात ती तिचे दैनंदिन अपडेट्स देत असते. काल तिने मुरांबा मालिकेच्या सेटवरचा शेवटच्या दिवसाचा व्लॉग शेअर केला. यात तिने हा निर्णय का घेतला हेही सांगितलं. ती म्हणाली, "आयुष्यात परिस्थितीनुसार काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. सध्या कबीर खूप लहान आहे आणि त्याला सांभाळायला कोणीही नाही. माझी आई पुण्यात असते. त्यामुळे मी पुण्याला आईच्या घराजवळच राहणार आहे जेणेकरुन ती कबीरची काळजी घेऊ शकेल आणि मी सिनेमा, वेबसीरिज येत आहेत त्याचं शूटिंग करु शकेल."
ती पुढे म्हणाली, "मालिकेचं शूटिंग मुंबईत २० दिवस असतं आणि इथे कबीरची काळजी घेणारं कोणीही नव्हतं. हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय आहे पण तो मी घेतला. कबीर माझ्यासाठी पहिलं प्राधान्य आहे. मला आता त्याला जास्तीत जास्त वेळ देता येईल. कारण तो आत्ता ज्या वयात आहे त्यात मी त्याला वेळ देणं गरजेचं आहे कारण नंतर मी हे परत आणू शकणार नाही. साईड बाय साईड मी काम करेन पण खूप काम केलं तर त्याला वेळ देता येणार नाही. त्याला सांभाळण्यासाठी मी कोणावर अवलंबून राहीन अशी कोणी व्यक्ती नव्हती म्हणून मी हा निर्णय घेतला. तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका जी नवीन जान्हवी येईल तिला स्वीकारा."