भामरागड : भामरागड ते आलापल्ली या मार्गाची यंदाच्या पावसाळ्यात दूरवस्था झाली आहे. रस्त्याला जागोजागी खड्डे पडले असून रस्ता दुरूस्तीच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहनचालक व भामरागडच्या नागरिकांना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे. आलापल्ली ते भामरागड हा ६५ किमीचा मार्ग आहे. या मार्गाची दुरूस्ती पेरमिली गावापर्यंत करण्यात आली होती. मात्र त्यापुढे रस्ता दुरूस्तीचे काम झाले नाही. जिल्हा निर्मितीच्या आधीपासून असलेल्या या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूकही आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या तसेच मोठे जड वाहने जातात. या रस्त्यावर आता पहिल्याच पावसात मोठे खड्डे पडले आहे. बांडेनगर ते भामरागड या मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने गिट्टी उखडलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीचे याकडे दुर्लक्ष आहे.या मार्गावर अनेक ठेंगणे व अरूंद पूलही आहेत. त्याची दुरूस्तीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात थोडाजरी पाऊस आला तरी हा मार्ग बंद होऊन जातो. या मार्गावरून पेपर मिलच्या बांबूच्या ट्रकचीही वाहतूक होत असते. याशिवाय तेंदूपत्ता संकलनाच्या काळात जड वाहनाची वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. पावसाळ्यात मोठे खड्डे पडल्याने यामध्ये पाणी जमा होऊन आहे. दुचाकी वाहनचालकाला याचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा येथे वाहनचालक पडून अपघात झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आलापल्ली ते भामरागड या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आलापल्ली-भामरागड रस्ता खड्ड्यात
By admin | Published: August 01, 2014 12:17 AM