प्रमुख मागणी : वनजमीन पट्ट्यासाठी अतिक्रमण पंजी उपलब्ध करून द्याअहेरी : १३ डिसेंबर २००५ पूर्वी वन जमिनीवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना सामूहिक व वैयक्तिक वनजमिनीचे पट्टे मिळण्याकरिता दावा सादर करण्यासाठी अतिक्रमण पंजी उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी प्रतिनिधी कैलास कोरेत यांच्या नेतृत्वात बुधवारी पेरमिली वनपरिक्षेत्रातील शेकडो नागरिकांनी आलापल्लीच्या उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ अन्वये दावे सादर केलेल्या अतिक्रमणधारकांना वनजमिनीचे पट्टे दिले जातात. वन जमीन पट्ट्याच्या प्रस्तावात वन चौकशी अहवाल, शासकीय वनअभिलेख, १३ डिसेंबर २००५ पूर्वी वनजमिनीवर अतिक्रमण असल्याचा पुरावा ग्राह्य धरण्यात येतो. काही वर्षांपूर्वी पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. मात्र अतिक्रमीत नागरिकांना अद्यापही अतिक्रमण पंजी (पीवार) प्रत उपलब्ध करून देण्यात आली नाही. यासंदर्भात नागरिकांनी पेरमिलीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना विचारणा केली असता, काही कारणास्ताव दस्तावेज उपलब्ध नसल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. त्यामुळे अतिक्रमणपंजी उपलब्ध करून देण्याची मागणी आलापल्लीचे वनसंरक्षक गिन्नी सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली. वन अभिलेख अतिक्रमण पंजी उपलब्ध करून दिल्यावर वनजमिनीचे सामूहिक व वैयक्तिक प्रलंबित दावे निकाली काढण्यास मदत होईल. तसेच संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी तुमच्या गावात येऊन अतिक्रमण पंजी उपलब्ध करून देतील, असे आश्वासन उपवनसंरक्षक सिंग यांनी दिले. याप्रसंगी राकाँचे पदाधिकारी इरफान पठाण, सीताराम मेश्राम, सुरेश मडावी, तुळशिराम मडावी, चैतू पल्लो, रमेश पल्लो, तुळशिराम पेंदाम, सतीश पेंदाम, नरसिंग कोडापे, दिलीप मडावी, मारोती मेश्राम, कमलाबाई कोडापे, चिंतामणी मडावी, पेंटू कोडापे, अमोल कोडापे, सावित्री आलाम, विलास तलांडे, गिरमा मेश्राम, तिरूपती पेंदाम आदींसह परिसरातील अतिक्रमणधारक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
वन विभागाच्या कार्यालयावर नागरिकांची धडक
By admin | Published: September 22, 2016 2:22 AM