आलापल्ली : उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात व्यंकटापूर येथे नुकताच कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात परिसरातील नागरिकांना अडीच हजार झाडांचे विरतण करण्यात आले.
कृषी मेळाव्यास आवलमारीच्या सरपंच सुनंदा कोडपे, उपसरपंच चिरंजीव चालविलवार, माजी सरपंच मारोती मडावी, पोलीसपाटील बाबूराव झाडे, मनोहर पागडे, श्यामराव कुळमेथे, जगय्यजी परकीवार, नामदेव कांबळे व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. याप्रंसगी अमोल ठाकूर यांनी गडचिरोली पोलीस विभाग नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचे सांगून कोणतीही समस्या असल्यास अहेरी हेल्पलाइन नंबर ७८८७३१३६७६ वर संपर्क साधण्याचा सूचना नागरिकांना दिल्या.
सरपंच सुनंदाताई कोडपे यांनी समाजाच्या विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे सर्वांना आवाहन केले तसेच सर्व गावकऱ्यांनी वारंवार पुढाकार घेऊन गावासाठी रस्ता तयार करून घेतल्याची माहिती दिली. पोलीसपाटील बाबूराव झाडे यांनी तेलुगू व गोंडी भाषेतून सर्व नागरिकांनी फळझाडे लावून त्यातून मिळणारे उत्पन्न बाजारात विकून आपली आर्थिक उन्नती करा, असे आवाहन केले.
बाॅक्स
दाखल्यांचे वितरण
कार्यक्रमात ४७ आयुष्यमान भारत कार्ड, ११ आधार कार्डचे वाटप करण्यात आले. नागरिकांना श्रवणबाळ योजना, पीएम किसान योजना, जॉब कार्ड काढणे याबाबत माहिती दिली. हद्दीतील प्रगतिशील शेतकऱ्यांचा मेळाव्यात सत्कार करण्यात आला. सत्कारार्थी शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्याबाबत मार्गदर्शन केले. व्यंकटापूर येथील मदानय्या आत्राम यांनी अनेक वर्षे एकट्याने अंगमेहनत करून शेततळे बांधले आहे. अमोल ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिले. गरजूंना कपडे तर विद्यार्थ्यांना व्हाॅलिबॉलचे वाटप करण्यात आले.
060721\1846-img-20210706-wa0013.jpg
फळझाडांच्या माध्यमातून आर्थिक विकास करूयात ... अमोल ठाकूर .