राज्यपालांना निवेदन पाठविले : आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनची मागणीअहेरी : भारतीय राज्यघटनेच्या स्विकृतीनंतर ६४ वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. धनगर जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याच्या शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. मात्र यामुळे अनुसूचित जमातीच्या लोकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनच्यावतीने अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, विशिष्ट भूप्रदेश, विशिष्ट बोलीभाषा, प्रथा, परंपरा, निसर्गावर आधारित जीवनपध्दती असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या समाजाला शासनाने आरक्षण दिले आहे. एकूण ४७ जमातींचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश होतो. या जमातीतील लोकांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी सोयीसुविधा देण्याच्या उद्देशाने अनुसूचित जमाती प्रवर्गाला राज्य घटनेने आरक्षण दिले आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी अनुसूचित जमातीतील लोकांचा विरोध नाही. मात्र त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. शासकीय सेवेतील वर्ग १ व वर्ग २ ची पदे भरताना अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना आरक्षणाचा विचार करून प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आॅल इंडिया आदिवासी फेडरेशनच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. मागण्यांचे निवेदन अहेरीचे नायब तहसीलदार सिलमवार यांना देण्यात आली. यावेळी एम्प्लाईज फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. रमेश हलामी, अहेरी तालुकाध्यक्ष रघुनाथ तलांडे, कुणाल कोवे, मधुकर सडमेक, मारोती आत्राम, नारायण कुसराम, नरेंद्र कोकुडे, विजय गेडाम, बाबुराव तोरे, विलास सिडाम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
धनगरांना एसटीत सामावू नका
By admin | Published: July 31, 2014 12:02 AM