गडचिरोली : आपल्या मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी १ आॅगस्टपासून बेमूदत संप सुरू केला आहे. यामुळे महसूल प्रशासनाचे काम ठप्प पडले आहे. याचा फटका विशेष करून शेतकरी व विद्यार्थ्यांना बसत आहे. नायब तहसिलदारांचे गे्रड वेतन वाढविण्यात यावे, कनिष्ठ लिपिकाचे पदनाम महसूल सहकाय्यक असे करण्यात यावे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास नोकरी देण्यात यावी, अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रियेतची टक्केवारी वाढविण्यात यावी, नायब तहसिलदारांची सर्व पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, कोतवालांना चतुर्थ श्रेणीची वेतन श्रेणी लागू करावी आदी मागण्यांसाठी महसूल विभागाचे नायब तहसिलदार, अव्वल कारकुन, लिपिक , वाहन चालक, शिपाई या संवर्गातील कर्मचारी १ आॅगस्टपासून संपावर गेले आहेत. संपाचा आजचा तीसरा दिवस आहे. सर्वच कर्मचारी संपावर गेल्याने तहसील कार्यालयाचे काम ठप्प पडले आहेत. बेमुदत संपावर जाण्यापूर्वी महसूल कर्मचाऱ्यांनी या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून निर्दशने केली होती. धरणे व लेखणीबंद आंदोलन केल्यानंतरही शासनाने मागण्यांसंदर्भात साधी चर्चासुध्दा संघटनेसोबत केली नाही. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविषयी तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. मागण्या निकाली काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार महसूल कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी लांबणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. प्रत्येक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर शेतीची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना कर्ज घेण्याबरोबरच विविध प्रकारचे दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात जावे लागते. मात्र या कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. गडचिरोली येथील आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे सल्लागार एच. ए. पठाण, अध्यक्ष एस. के. बावणे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना गडचिरोलीचे अध्यक्ष एस. के. चडगुलवार, सरचिटणीस व्ही. एम. सवरंगपते, लतीफ पठाण, येरमे, कविता नायडू, धात्रक आदींनी सहभाग घेतला होता.
संपाने महसूल प्रशासनाचे काम ठप्प
By admin | Published: August 03, 2014 11:23 PM