प्राणहिता नदीघाट : प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणीअहेरी : जवळील वांगेपल्ली येथुन महाराष्ट्र व आंध्रप्रदेशला जोडणाऱ्या प्राणहिता नदीवरुन डिझेल मशीनच्या डोंग्याने दररोज प्रवाश्यांची वाहतुक सुरु आहे. मात्र ही वाहतुक करताना कोणत्याच प्रकारची सुरक्षा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे हा प्रवास अत्यंत जीवघेणा होत आहे. प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली नदीघाटावरुन दररोज शेकडो प्रवाश्यांची ने-आण होत आहे. प्रत्येकी ४०-५० रुपये घेतल्या जाते. मात्र प्रवास करताना सुरक्षेची कोणतीच हमी राहत नाही. महाराष्ट्र व आंध्रप्रदेशच्या गुडेम येथील ठेकेदारांनी १५ ते २० हजार रुपये भरुन वाहतुकीचा ठेका घेतला आहे. मात्र सर्व नियम व अटी धाब्यावर बसविले आहे. सध्या प्राणहिता नदी दुथडी भरुन वाहत आहे. अचानक कोणता अपघात घडल्यास जीवितहानी होऊ शकते. कधी-कधी नावाडी मद्यप्राशनसुद्धा करुन डोंगा चालवित असतात. सुरक्षेबाबत लाईफ जॅकेटसाठी नावाड्यास विचारले असता लाईफजॅकेट आम्हाला माहित नाही. शिवाय कधी बघितले नाही, असे उत्तर मिळाले. मागीलवर्षी आंध्रप्रदेशची डीझेल मशीनची नाव नदीच्या मधोमध येऊन बंद पडली होती. तेव्हा खुप मोठा अपघात होण्यापासून वाचला होता. मात्र त्यातून नावाड्यांनी कोणतीच शिकवण घेतली नाही. प्रवाश्यांसोबत दुचाकीचीसुद्धा वाहतुक होते. त्यामुळे आणखीच समस्या उद्भवु शकते. मागील अनेक वर्षांपासून वांगेपली नदीघाटावर पूल बांधण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र या संबंधी लोकप्रतिनीधींनी दिलेले आश्वासन पूर्णपने हवेत वीरले आहे. या नदीवर पूल बनल्यास काजगनगर, मंचेरियाल, चेन्नुर सारख्या महत्त्वाच्या शहरात जाणे सोयीचे होऊ शकते व पैशांची, वेळेची बचत होऊ शकते. नदीला सध्या पूर आला असून अशीच विनासुरक्षा वाहतुक सुरु राहिल्यास काही अनुचित प्रकार घडु शकतो व जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने कडक नियम तयार करुन याबाबत नावाड्यांना सूचना दिल्या पाहिजे, अन्यथा भविष्यात अपघात व जीवितहानी अटळ आहे. (प्रतिनिधी)
नदीतून जीवघेणा प्रवास
By admin | Published: August 03, 2014 12:05 AM