गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात वैयक्तिक स्वरूपाचे वनपट्टे वाटपाचे काम देशात प्रथम क्रमांकाचे झाले आहे. जिल्ह्यात ३० हजार १६७ जबरानजोतधारकांना पट्टे वितरीत करण्यात आले. मात्र त्यापैकी २ हजार ५४८ शेतकऱ्यांना पट्ट्याच्या शेतीचा सातबारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या कुठल्याही शेती योजनेचा लाभच मिळत नाही. त्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहे. केंद्र सरकारने २००८ मध्ये वनकायदा शिथिल केल्यानंतर अनेक वर्षापासून जमिन कसणारे भूमिस्वामी झालेत. २०१३ पर्यंत ३० हजार १६७ जबरानजोतधारकांना वनजमिनीच्या पट्ट्याचे वाटप करण्यात आले. परंतु त्यातील २ हजार ५४८ पट्टेधारकांना अद्यापही महसूल विभागाकडून सातबारा देण्यात आलेला नाही. गडचिरोली तालुक्यात १९, धानोरा ४२४, चामोर्शी ६३६, मुलचेरा ३७०, देसाईगंज १४४, आरमोरी १४४, कुरखेडा १३१, कोरची २९, अहेरी १४६, सिरोंचा १८०, एटापल्ली २४५, भामरागड तालुक्यातील ८० जबरानजोतधारकांना सातबारा मिळालेला नाही. जिल्ह्यात ३० हजार १६७ पैकी २६ हजार ७७६ पट्टेधारकांना सातबारा देण्यात आला. मात्र २ हजार ५४८ पट्टेधारकांना अद्याप सातबारा मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना सिंचन विहीर, कृषी पंपाला वीज पुरवठा, जिल्हा परिषद कृषी विभागाकडून वितरीत होणारे शेती साहित्य तसेच शेतीसाठी खरीप हंगामात मिळणारे पीक कर्ज आदी मिळण्यात अडचणी येत आहे. या संदर्भात सदर पट्टेधारकांनी अनेकदा शासनस्तरावर पाठपुरावाही केला. मात्र प्रशासकीय लालफितशाहीमुळे पट्टेधारकांना सातबारा मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा शेती विकास रखडलेला आहे. (शहर प्रतिनिधी)
सातबाराअभावी जबरानजोत अडचणीत
By admin | Published: August 05, 2014 11:26 PM