ए. आर. खान - अहेरीलोकसभा निवडणुकीनंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोरदार उचल खालली आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची पहिली मशाल अहेरी भूमितूनच दिवंगत राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी चेतविली होती. आता स्वतंत्र विदर्भाची मागणी घेऊन अहेरी भागातील अनेक संघटना एकवटल्या आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागाचा विकास शक्य नाही, असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ विदर्भ राज्याची घोषणा करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही पूर्वीच्या सी.पी. अॅन्ड बेरारच्या काळापासूनची जुनी आहे. १ मे १९६० ला भाषिक तत्वाच्या आधारे महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. त्यावेळीही विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली होती. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील स्वार्थी राजकारण्यांनी विदर्भाच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी अहेरी येथून कै. राजे विश्वेश्वरराव महाराज, लोकनायक बापूजी अणे, ब्रिजलाल बियाणी, जांबुवंतराव धोटे या आदींनी आंदोलन व पदयात्रा करून नाग विदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून ही मागणी रेटून धरली होती. मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी विदर्भातील जनतेच्या भावनांची कदर केली नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रश्न विविध राजकीय पक्षांनी आपल्या सोयीनुसार वापरून निवडणुका जिंकल्यात. आता मात्र विदर्भवादी आक्रमक झाल्या आहेत. अहेरी उपविभागात नाग विदर्भ आंदोलन समिती, अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती, आॅल इंडिया एम्प्लाईज फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघटना, ओबीसी संघटना तसेच या भागातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या माध्यमातून आता स्वतंत्र विदर्भाची मागणी होऊ लागली आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या पाठीशी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्यास गडचिरोली जिल्ह्यात विकासाला चालना मिळून सिंचन, उद्योग, रस्ते, पूल, रेल्वे आदी येऊन या भागातील खनिज व जलसंपत्ती तसेच वनसंपत्ती या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याचा विकास शक्य असल्याचे विदर्भवाद्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला आता मोठे बळ मिळाले आहे. विदर्भात अनेक संघटनांमार्फत आता स्वतंत्र राज्याची मागणी रेटली जात आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम विदर्भवादी नेत्यांसोबतच सामाजिक कार्यकर्तेही करीत आहे. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, नाविस, बसपा या पक्षांचा स्वतंत्र विदर्भाला पाठींबा आहे.
विदर्भ द्या; अनेक संघटना एकवटल्या
By admin | Published: July 31, 2014 12:01 AM