मुख्यमंत्र्यांना निवेदन : अहेरीवरून हैद्राबाद बस सुरू कराअहेरी : सिरोंचा तालुक्यात तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्य सरकारकडे केली आहे. तसेच अहेरी उपविभागातील व जिल्ह्यातील प्रमुख मार्गांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी कमी उंचीच्या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गांची दुरूस्ती करून खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. अहेरी-सिरोंचा-हैद्राबाद अशी बससेवा सुरू करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी राममूर्ती यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात आले आहे. एसडीओंना निवेदन देताना राजेश्वर उत्तरवार, कुसूम दुधी, अंजना पेंदाम, आदिल पठाण, आत्माराम गदेकर, पुष्पा अलोणे आदी उपस्थित होते. पाठपूरावा करण्याचे आश्वासन एसडीओंनी दिले.(प्रतिनिधी)या मार्गांची करा दुरूस्तीआलापल्ली-मुलचेरा, अहेरी-आष्टी, आलापल्ली-सिरोंचा, आलापल्ली-एटापल्ली, एटापल्ली-कसनसूर-जारावंडी, अहेरी शहर या प्रमुख मार्गांची दयनिय अवस्था झाली आहे. शेकडो लोक या मार्गावरून आवागमन करतात. मात्र रस्ता खराब झाल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेकांना पाठीचे आजार वाढले आहेत. याशिवाय एटापल्ली-बुर्गी-कांदोळी, मन्नेराजाराम-ताडगाव, मोयाबीनपेठा या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अहेरी-देवलमरी-व्यंकटापूर या रस्त्याचीही दुरूस्ती करण्यात यावी, अहेरी-आष्टी दरम्यान दिना नदीच्या पुलावर मोठा खड्डा पडला आहे. तसेच चौडमपल्ली येथील पुलावरही अशीच अवस्था आहे. हे खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. अहेरी-बुर्गी-कांदोळी या मार्गावर बसफेरीही सुरू करण्यात यावी, असे निवेदन पाठविण्यात आले आहे.
गोदावरीच्या पुलाला आर. आर. पाटील यांचे नाव द्या
By admin | Published: September 23, 2016 1:43 AM