गडचिरोली : आंध्रप्रदेशात गडचिरोली मॉडेल म्हणून नावारूपास आलेली दुहेरी पंप योजना गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत यशस्वीपणे राबविली जात आहे. या योजनेने ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील माठाचे ओझे कमी केले आहे. आजमितीस जिल्ह्यात सुमारे ४०१ योजनांपैकी ३०० योजना सुरू आहेत तर काहींचे बांधकाम सुरू आहेत. ५० ते १०० लोकवस्ती असलेल्या गावाला मोठ्या नळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. शासनाने पाणी पुरवठा योजना सुरू केली तरी ती चालविणे ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे १०० लोकवस्तीपर्यंतच्या गावात नळ योजना नसल्याने गाववासीयांना प्रचंड पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागत होता. पाण्याने भरलेले हंडे वाहण्यासाठीच महिलांची बरीच शक्ती खर्च होत होती. या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाद्वार हातपंपावरच मोटारपंप बसवून मोटारपंपाच्या सहाय्याने सदर पाणी टाकीत टाकण्यात येते. त्यानंतर टाकीतील पाणी सभोवतालच्या नागरिकांच्या घरापर्यंत नळाद्वारे पोहचविण्यात येते. एकंदरीतच ही योजना मोठ्या नळ योजनेप्रमाणेच कार्य करते. ही योजना कार्यान्वीत करण्यासाठी फक्त २.५ लाख रूपये खर्च येतो. हा सर्व खर्च राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत भागविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ही योजना २००८-०९ पासून राबविण्यात येत आहे. जवळपास ही योजना ३०० गावांमध्ये यशस्वीपणे सुरू आहे. तर १०० गावांमध्ये या योजनेचे काम प्रगतीपथावर आहेत. ५ वर्षापर्यंत देखभाल व दुरूस्तीचा खर्च कंत्राटदाराकडे सोपविण्यात आला आहे. ज्या गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. त्या महिलांच्या घरापर्यंत दुहेरी पंप योजनेद्वारे पाणी पोहचले आहे. याचा आनंदही महिला व नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. ही योजना यशस्वी होईल की नाही या विषयी ग्रामस्थ शांसक असल्याने सुरूवातीला ही योजना राबविण्यास ग्रामपंचायती तयार नव्हत्या. मात्र याचे फायदे लक्षात आल्यानंतर ही योजना सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. यासाठी लहान पंप वापरला जात असल्याने यासाठी विद्युत बिलही कमी येते, सदर बिल भरणे ग्रामपंचायतीला सहज शक्य होणे हेच खरे या योजनेचे यश असल्याचे अधिकारी व गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)
हातपंपाचे पाणी पोहोचले घरांत
By admin | Published: August 05, 2014 11:26 PM