भामरागड : येथील दीडशे ते दोनशे एकर जमीन सिंचनाखाली आणणारा भामरागडचा तलाव जून, जुलै महिना लोटूनही अद्याप कोरडाच आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. गतवर्षी भामरागडचा हा तलाव या कालावधीत १०० टक्के पूर्ण भरला होता. यावर्षी शेतीच्या कामाला सुरूवात होऊन दोन महिने लोटेले. परंतु तलाव भरलेला नाही. तलाव भरलेला नसल्याने गावातील पाण्याची पातळीही खालावलेलीच आहे. या तलावाच्या भरवशावर २०० एकर शेतीचे सिंचन होते. मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तलावाच्या पाण्याची फारशी गरज भासली नव्हती. शेतीचे काम संपल्यानंतर तलाव तुडूंबच भरून होता. या भागात पुन्हा पीक घेतली जात नाही. जिंजगाव, मन्नेराजाराम, मलमपोडूर, येचली, कियर या गावात तलावामध्ये मोठा जलसाठा शिल्लक असल्याने गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली होती. इतर भागाप्रमाणे या तालुक्यात कमी पाऊस झालेला आहे. यंदा तालुक्याची वाटचाल कोरड्या दुष्काळ्याच्या दिशेने सुरू झाली आहे. मागील आठवड्यातील चार-पाच दिवस वगळता पाऊस न झाल्याने शेतकरीही चिंताग्रस्त आहे. यंदा शेतकऱ्यांसमोरही कमी पावसामुळे बिकट परिस्थिती आहे.भामरागड तालुक्यात एकही सिंचन योजना नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी पावसाच्या भरवशावर शेती करतात. अलीकडे धानाच्या व्यतिरिक्तही दुसरे पीक शेतकरी घेत आहेत. गावातील तलाव हे शेतीच्या सिंचनासाठीचे मोठे स्त्रोत आहे. मात्र यंदा तलाव पावसाअभावी रिकामे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कालांतराने भामरागडला पाणी टंचाईची समस्याही जाणविण्याची शक्यता आहे. या तालुक्यातील मोठ्या नद्यांवर सिंचन योजना कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
भामरागड तालुक्यातील तलाव कोरडेच
By admin | Published: July 29, 2014 11:48 PM