करेमरका गावात कार्यक्रम : शेतात फवारणीही केलीधानोरा : तालुक्यातील करेमरका गावात १९ सप्टेंबरला स्वच्छता अभियान राबविण्यात आले. करेमरका ग्रामस्थांनी गावाच्या आर्थिक, सामाजिक विकासाकरिता महिला ग्रामसभा तयार केली आहे. महिला ग्रामसभेने आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन वेगवेगळे कृती कार्यक्रम राबविण्याआधी ग्राम स्वच्छता अभियान हाती घेतले. या अभियानात दराची, डब्बा, तोयागोंदी, गट्टेपायली, गिरोला, ढवळी, मकेपायली, मेंढाटोला, हेटी, वर्कीकसा, जपतलाई, कोसमटोला या १२ गावातील ग्रामसभांचे सदस्य उपस्थित होते. गट ग्रामपंचायत सालेभट्टीच्या सचिवांना बोलविण्यात आले व नाल्यावर पूल बांधण्याविषयी त्यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आ. हिरामण वरखडे यांनी रासायनिक खताचा वापर न करता वनस्पतीला लागणाऱ्या ऊर्जेचा खरा स्त्रोत हा सूर्य आहे, असे सांगत जंगलातील पालापोचाळा व झाडी खालील माती, गोमूत्र, गूळ-बेसन, मोहफूल आदींचा वापर करून त्याचे रसायन तयार करून सांदवाडीतील भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी याचा वापर करावा, तसेच कारले, दुधी यांच्या वेलीवर तसेच शेतातील धान्यावर या रसायनाने फवारणी करावी, अशी सूचना केली. गावातील महिलांनी सर्व घरांची पाहणी करून शौचालय, बाथरूम याचा वापर कसा करावा, याबाबत विद्या वरखडे यांनी मार्गदर्शन केले. महिला ग्रामसभेच्या खात्यातील निधीचा वापर कुर्मा घर, बाथरूम, शौचालय याचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो, असे माजी आ. वरखडे यांनी सूचविले. सांस्कृतिक सभागृह गोटूलची साफसफाई करण्यात आली. यावेळी महिला ग्रामसभा संयोजिका विद्या वरखडे, छाया पोटावी, कौशल्या तुलावी, शांताबाई नरोटे, हिरामण गावळे, रवींद्र नरोटे, गीता मडावी, वनीता कोल्हे, महादेव नरोटे आदी उपस्थित होते. यापूर्वीही १२ गावातील महिलांनी एकत्र येऊन गावात विविध उपक्रम राबविले आहेत व हा नित्यक्रम सतत कायम ठेवण्यात आला आहे.
१२ ग्रामसभेचे सदस्य स्वच्छता अभियानात सहभागी
By admin | Published: September 23, 2016 1:42 AM