जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक; उद्योजकांनी मांडल्या समस्या गडचिरोली : गडचिरोलीमध्ये उद्योगासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, या भूमिकेतून उद्योगाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा शुक्रवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एम. एन. परिहार, स्माल स्केल इंडस्ट्रिजचे जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे, उद्योग समितीचे अध्यक्ष दीपक सरोदे, उद्योजक संघटनेचे सचिव मिलिंद डोंगरे, अतुल बोमनवार, निकेतन गद्देवार, अकबर जीवानी, अझिमा जीवानी आदी उपस्थित होते. उद्योगास विनाखंड आणि विशिष्ट दाबासह वीज पुरवठा आवश्यक असतो. मात्र तसा वीज पुरवठा होत नाही. ही उद्योजकांची मुख्य समस्या आहे. ही समस्या सोडवावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. वीज वितरण कंपनीने यासाठी स्वतंत्र अधिकारी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या. जिल्ह्यातील उद्योगात स्थानिकांना रोजगार अधिक मिळावा, यासाठी पर्यवेक्षीय पदांपैकी ५० टक्के आणि त्याखालील ८० टक्के स्थानिक आहेत, अशी माहिती उद्योजकांनी दिली. पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत जिल्ह्यास २२ लाखांचे उद्दिष्ट प्राप्त आहे. यासाठी ४० अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच सुधारित बिज भांडवल योजनेत १८ लाख ३० हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी २ लाख ६६ हजार रूपयांचे वाटप पूर्ण झाले आहे, अशी माहिती समितीला देण्यात आली.उद्योगांनी स्वत:ची नोंदणी व्यावसायिक प्रशिक्षण भागिदार अर्जात व्हीटीपी म्हणून नोंदणी करून घ्यावी, अशा भागिदारांना कौशल्य प्रशिक्षणासाठी पूर्ण खर्च शासन देते. यातील काही जणांना तर नंतर उद्योग सामावून घेऊ शकतात. याबाबत उद्योजकांनी सकारात्मक विचार करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नायक यांनी केले. यावेळी उद्योजकांच्या अडचणीही जाणून घेतल्या. (नगर प्रतिनिधी)
उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार
By admin | Published: September 24, 2016 3:02 AM