मन्नेराजाराम, भामनपल्ली भाग : पोलीस व नागरिक कामाला लागलेभामरागड : मागील दोन वर्षांपासून रस्त्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या मन्नेराजाराम, भामनपल्ली गावातील नागरिकांनी श्रमदानातुन रस्ता दुरूस्ती करून गावात बसफेरी सुरू करावी, यासाठी बुधवारपासून पोलिसांच्या सहकार्याने रस्ता दुरूस्तीसाठी श्रमदान सुरू केले आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी रस्ता समस्येबाबत राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पोलीस विभागाला दिलेल्या निवेदनातून केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून मन्नेराजाराम-भामनपल्ली रस्ता व पुलाच्या दुरूस्तीबाबत प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु नक्षलवाद्यांच्या भितीपोटी रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी कोणीही कंत्राटदार पुढे येत नाही, असे कारण देत सरकारने रस्त्याची दुरूस्ती केलेली नाही. यावर तोडगा काढण्याबाबत सरकार गंभीर नसल्याने या भागात रस्त्यांचा प्रश्न बिकट झाला आहे. मन्नेराजाराम, भामनपल्ली परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बससेवाही बंद झाली आहे.मागील दोन वर्षांपासून नागरिकांना खासगी प्रवाशी वाहनांचा आधार प्रवासासाठी घ्यावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्रात जाऊन रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करावी, या मागणीचे निवेदन ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरिक्षक परजने यांनी सादर केले. त्यानंतर परजने यांनी यासंदर्भात भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या. मन्नेराजाराम, भामनपल्ली परिसरातील नागरिकांची वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन नागरिकांची सभा बोलावून श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करण्याबाबत पोलीस विभागाने पावले उचलले. त्यानंतर ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी मन्नेराजाराम परिसरातील येचली, भामनपल्ली, मडवेली, मरपल्ली, झिंजगाव, मडवेली, चिचोडा, टोला, इरकडुम्मे, मोकेला, रेला, बोरीया, गोरनूर, पडतमपल्ली, कसनसूर, पल्ली, जुमाबाई, लंकनगुडा, रायगुडा, बासागुडा, गेर्रा, सिपनपल्ली, दुब्बागुड्डा, पल्ली या गावात सभा घेतल्या व नागरिकांनी पोलिसांच्या सहकार्यातून रस्ता दुरूस्तीच्या कामात श्रमदान करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे बुधवारपासून ताडगावचे प्रभारी पोलीस अधिकारी परजने यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक दळवी, पाटील, बोरसे व नागरिक यांनी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजविले. तसेच खचलेल्या रस्त्यावर माती टाकली. आता या परिसरात बससेवा सुरू व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भामरागड तालुक्यात अनेक गावात रस्ते उखडलेले आहेत. त्याची दुरूस्तीच मागील पाच ते दहा वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. भामरागड-लाहेरी मार्गाची वाईट अवस्था झाली असून त्याच्याही दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)
श्रमदानातून रस्ता दुरूस्ती
By admin | Published: September 23, 2016 1:41 AM