३४ महाविद्यालयांना फटका : गोंडवाना विद्यापीठ प्राचार्य फोरमची मागणीगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ स्थापन होऊन तीन वर्ष पूर्ण झालीत. मात्र या विद्यापीठात अनेक समस्या अद्यापही कायम आहेत. याचा फटका विद्यापीठातील ३४ महाविद्यालयांना बसत आहे. त्यामुळे राज्य शासनाने गोंडवाना विद्यापीठाच्या समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ प्राचार्य फोरमनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.पत्रकार परिषदेत माहिती देताना प्राचार्य फोरमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. ए. शेख म्हणाले, शासनाने विद्यापीठात तत्काळ पूर्णवेळ कुलगुरूंची नियुक्ती करावी. विद्यापीठात विविध प्राधीकरणाचे तत्काळ गठण करण्यात यावे, राज्य शासनाने विद्यापीठाला इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, गोंडवाना विद्यापीठ २ एफमध्ये नसल्यामुळे या विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२ (बी) अनुदानासाठी मान्यता दिली जात नाही. १२ बी अनुदानासाठी गोंडवाना विद्यापीठात किमान ५ स्वतंत्र पदव्युत्तर विभाग व या विभागात प्राध्यापकांची नियुक्ती झाली पाहिजे. मात्र स्वतंत्र विभाग नसल्याने याचा फटका इतर महाविद्यालयांना बसत आहे. त्यामुळे राज्य शासनाने गोंडवाना विद्यापीठात तत्काळ स्वतंत्र ५ पदव्युत्तर विभागाची नियुक्ती करावी, अशी मागणी प्राचार्य डॉ. शेख यांनी यावेळी केली. गोंडवाना विद्यापीठाने १२ बी अनुदानाचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे दाखल केला आहे. मात्र सदर प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या विद्यापीठांतर्गत ३० महाविद्यालयांना २ एफ १२ बी चे अनुदान आहे.मात्र विद्यापीठांतर्गत ३४ महाविद्यालय या अनुदानापासून वंचित आहेत. विद्यापीठ विभाजनाचा अनेक महाविद्यालयांना फटका बसला असल्याचेही फोरमच्या सदस्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री, प्राचार्य डॉ. हंसा तोमर, प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, प्राचार्य डॉ. बाळबुध्दे, प्राचार्य डॉ. साकोरे, प्राचार्य डॉ. कावळे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
विद्यापीठाच्या समस्या मार्गी लावा
By admin | Published: August 05, 2014 11:25 PM