अभाविपचे नेतृत्व : ५५ मागण्यांचे निवेदन सादर; पाच किमी. पायी चालत गेले विद्यार्थी
गडचिरोली : विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात गुरूवारी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक ते गोंडवाना विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास पाच ते सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या घोषणांमुळे विद्यापीठाचा परिसर दणाणून गेला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मागील १५ दिवसांपासून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये जाऊन मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. गुरूवारी सकाळी गडचिरोली शहरातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार काही शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सुटी जाहीर केली. दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चामध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. चंद्रपूरवरून जवळपास २५ ते ३० खासगी बसेसने विद्यार्थी आले होते. विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयी मोर्चातील विद्यार्थी घोषणा देत होते. जवळपास एक किमी अंतरावर विद्यार्थ्यांची रांग लागली होती. उल्लेखनिय बाब म्हणजे, या मोर्चात विद्यार्थ्यांसमावेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारीही इंदिरा गांधी चौक ते विद्यापीठापर्यंत पायीच चालत गेले. त्यामुळे मोर्चेकऱ्यांचा उत्साह प्रचंड दुणावलेला होता. या मोर्चात जवळजवळ सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले असावेत, असा दावा पोलीस प्रशासनानेही केला आहे.विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर सभेचे आयोजन करण्यात आले. सभेदरम्यान अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात, असे आवाहन केले. अन्यथा यापेक्षाही मोठा मोर्चा विद्यापीठावर काढला जाईल, असा इशारा सुध्दा दिला. मोर्चाचे नेतृत्व अभाविपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रघुवीर हंसराज अहीर, अभाविपचे प्रांत उपाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, अभाविपचे प्रांत सहमंत्री अक्षय जोशी, अभाविपचे नगरमंत्री हर्षल गेडाम, जिल्हा संयोजक सुभाष उप्पलवार, चंद्रपूर महानगर संघटनमंत्री सौरभ कावळे, अश्विनी भिसे, पल्लवी नरोटे, सुरेंद्र नाईक, आकाश सातपुते, गौरव होकम, युवराज सोनकुसरे, शुभम दयालवार, वैष्णवी डोंगर, राहूल टाकघर आदींनी केले. (नगर प्रतिनिधी)