गडचिरोली : राज्यशासनाने गुटखा व तंबाखुजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस या पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. या कारवाईमुळे धास्तावलेल्या विक्रेत्यांनी आता खर्रा घोटण्यासाठी मशीनचा वापर सुरू केला असून दररोज ५०० ते १००० खर्रे तयार करून त्यांची डिलिव्हरी शाळकरी मुलांच्या मार्फत संबंधिताना करण्याची व्यवस्था करून दिली आहे. त्यामुळे शासनाच्या खर्राबंदीचा शौकिनांना कुठलाही फटका बसलेला नाही व विक्रेत्यांचेही नुकसान होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात गतवर्षीपासून गुटख्यासोबतच तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधित सुपारी यावर बंदी घालण्यात आली आहे. पानठेल्यांवर आता काही पानठेले वगळता पान कुठेही मिळत नाही. सरसकट सुपारी व तंबाखुजन्य पदार्थाची (खर्राची) विक्री करण्यात येते. साधारणत: आज २० ते २५ रूपयाला तंबाखुजन्य पदार्थाचा खर्रा गडचिरोली जिल्ह्यात विकला जातो. याचे खास शौकिण आहेत. ते एका दिवसाला दोन ते तीन खर्रे सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत खातात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. एका दिवसात गडचिरोली जिल्ह्यात दोन ते अडीच लाख रूपयाची उलाढाल या व्यवहारात होते. बंदीमुळे आता पोलीस व अन्न व औषध प्रशासन या दोघांचेही या व्यवसायावर बारकाईने लक्ष आहे. काही पानठेला व्यावसायीकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईला लोकप्रतिनिधीसह काही संघटनांचाही विरोध आहे. ही बाब लक्षात घेऊन या विक्रेत्यांनी घरपोच व मागेल त्या ठिकाणी खर्रा पोहोचविण्याची व्यवस्था सुरू केली आहे. सकाळी मशीनद्वारे हजार ते दीड हजार खर्रे तयार करून त्याच्या पुड्या बांधून थैलीमध्ये शाळकरी मुलांचा वापर करून त्या संबंधिताना पाठविल्या जातात. एका पुडीला किमान २० रूपये किंमत घेण्यात येत आहे. वाटप करणारा हा पोरगा नगदी पैसे घेऊन तासा-दीडतासात सर्व काम फत्ते करतो. भ्रमणध्वनीवर मागणी नोंदविताच अवघ्या १० ते १५ मिनिटात संबंधितांना खर्रा उपलब्ध होतो. त्यामुळे बंदी नावालाच उरली आहे व शाळकरी मुलांना या कामात ओढून त्यांचेही भविष्य खराब करण्याचे काम सुरू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
खर्रा पोहोचविण्यासाठी शाळकरी मुलांचा वापर
By admin | Published: August 03, 2014 11:22 PM