लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई: म्हादईसाठी सर्वपक्षीय जनआंदोलन करावे, असा निर्धार वाळपईतील सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा फ्रंट यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीला प्रज्वल साखरदांडे, हृदयनाथ शिरोडकर, उदय म्हांब्रे, तनोज अडवलपालकर, शिवाजी देसाई, नितिन शिवडेकर, राजेश सावंत, गौरीश गावस, विश्वेश परोब, रघू गावकर यांची उपस्थिती होती.
शिवाजी देसाई यांनी सांगितले की, म्हादई आंदोलनासाठी समिती नेमण्याची गरज आहे. तसेच सत्तरीत आंदोलनाची खरी गरज आहे. गोव्यात सध्या पाणीटंचाई आहे. त्यात जर म्हादईचे पाणी वळवले, तर पुढे मोठी समस्या निर्माण होईल. राजेश सावंत यांनी सांगितले की, सत्तरीत म्हादईबाबत अनेक गैरसमज असून जनजागृती होण्याची गरज आहे.
विश्वेश परोब यांनी सांगितले की, म्हादईची स्थिती काय आहे, याबद्दल चर्चा होण्याची गरज आहे. त्याबद्दल स्पष्ट चित्र होण्याची गरज आहे. यावेळी प्रज्वल साखरदांडे, हृदयनाथ शिरोडकर, उदय म्हांब्रे, तनोज अडपईकर यांनी बैठकीला मार्गदर्शन केले. यावेळी रणनीती ठरविण्याबाबतही चर्चा झाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"