सारीपाट: फुटले ते फसले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 08:14 AM2023-04-09T08:14:39+5:302023-04-09T08:15:47+5:30

सहा महिन्यांपूर्वी जे आठ आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत, त्यापैकी काहीजण २०२७ मध्ये आपटतील. काहीजण तर वन टाईम एमएलए ठरतील, ही लोकांमधील चर्चा नजरेआड करता येत नाही.

congress rebel mlas joined bjp and its impact in future goa politics | सारीपाट: फुटले ते फसले

सारीपाट: फुटले ते फसले

googlenewsNext

- सद्गुरू पाटील

सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसचे एकूण स आठ आमदार फुटले व भाजपमध्ये गेले. आता साडेसहा महिन्यांचा काळ उलटून गेला. मात्र भाजपमध्ये गेले काही आमदार अजून समाधानी नाहीत. कारण त्यांना मनाजोगे कोणतेही मोठे पद किंवा सरकारी पद दिले गेलेले नाही.

नुवेचे आमदार तथा माजीमंत्री आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रयत्न केला तरी भाजपचे दिल्लीतील श्रेष्ठी अजून आलेक्सवर प्रसन्न झालेले नाहीत. त्यांना मंत्रिपद देण्यासाठी एखाद्या हिंदू मंत्र्याला वगळण्याची नियोजित कृती भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांना मान्य नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील काही मंडळींनीही असे करू नका असाच सल्ला भाजपला दिलेला आहे. त्यामुळे आलेक्स सिक्वेरा यांचा शपथविधी अडला आहे. काँग्रेसचे सात आमदार फुटण्यास तयार झाले होते, त्यावेळी आठव्या आमदाराला खूप महत्त्व आले होते. आलेक्स सिक्वेरा हे आठवे आमदार होते. 

आपल्याला मंत्रीपद मिळणार असेल तरच आपण येईन अशी सिक्वेरा यांची अट होती. मुख्यमंत्री सावंत यांनी ती मान्य केली होती. मात्र आता मुख्यमंत्र्यांचीही अडचण झाली आहे. कर्नाटकात येत्या महिन्यात विधानसभा निवडणूक होईल. कदाचित कर्नाटकच्या निकालानंतर गोव्यातील मंत्रिमंडळ बदलाविषयी एखादा निर्णय होऊ शकतो.

सावंत मंत्रिमंडळात दोन गट आहेत. एका गटाला दिगंबर कामत, मायकल लोबो वगैरे नेते पुन्हा भाजपमध्ये आलेले नकोच होते. या गटाने खूप आदळआपट केली होती, पण भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी काँग्रेस पक्ष फुटावा म्हणून गंभीरपणे प्रयत्न केले. खास आसाममधून सगळे वजन वापरले गेले. त्यामुळे कामत, लोबो, डिलायला, संकल्प आमोणकर यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे झाले. मुख्यमंत्री सावंत यांची खुर्ची त्यामुळे अधिक बळकट झाली असे अजूनही म्हणता येते. मात्र मंत्रिमंडळातील व भाजपमधील अस्वस्थता अजून वाढलेली आहे. बार्देशमध्ये मंत्री रोहन खंवटे व आमदार मायकल लोबो यांच्यात संघर्ष आहे. कळंगुटच्या पूर्ण किनारपट्टीत कुणाचे नियंत्रण असावे यावरून हा संघर्ष आहे. लोबो यांच्याशी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचेही अजून पटत नाही. लोबो यांना मंत्रिपद मिळणारच नाही, पण त्यांना पीडीए देखील मिळणार नाही एवढी काळजी काही नेत्यांनी घेतली.

दिगंबर कामत हेदेखील मंत्रिमंडळात आलेले भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांना नको आहे. कामत यांना दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देऊया असे काही मंत्र्यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांना सुचविले आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचेही कामत यांच्याशी पटत नाही. कामत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू नये म्हणून जे कुणी प्रयत्न करतात, त्यात माविनदेखील आहेत. कामत यांना दक्षिण गोव्यात तिकीट दिले गेले तर ते जिंकूनही येतील पण कामत स्वत: गोवा सोडून लोकसभेत जाणार नाहीत. कामत यांना खासदार होण्याची इच्छा नसेलच याची कल्पना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आहे. कामत मंत्रिमंडळात आले तर सीएमपदासाठी आणखी एक नवे स्पर्धक तयार होतील अशी भीती काहीजणांना वाटते

संकल्प आमोणकर हे मुरगावचे आमदार. काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले होते. ते भाजपमध्ये जातील असे मुरगावमधील अनेक काँग्रेसनिष्ठ मतदारांना वाटले नव्हते. मात्र संकल्पने भाजपमध्ये उडी टाकली. त्यामागचे कारण असे की त्यांनाही मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले गेले होते. संकल्प आमोणकर यांनी फुटताना भाजपकडून निधी स्वीकारला नाही. त्यांना मंत्रीपदच हवे होते. पण अद्याप दिलेले नाही. आमोणकर यांचा त्यामुळे अपेक्षाभंग झाला आहे. त्यांना पीडीएसारखी वजनदार यंत्रणाही दिली नाही. तसेच फलोत्पादन किंवा अन्य एखादे महत्त्वाचे महामंडळही दिलेले नाही. त्यांना बालभवनचे चेअरमनपद दिले गेले. म्हणजे त्यांच्या जखमेवर मुख्यमंत्र्यांकडून एक प्रकारे मीठच चोळले गेले. संकल्प भाजपमध्ये गेल्याने संकल्पला फायदा झाला की नाही हे २०२७ साली होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीवेळी कळून येईल. तूर्त संकल्प यांच्या मतदारसंघात विकास कामे काही प्रमाणात होतीलही.

सांताक्रूझचे आमदार रुदोल्फ फर्नाडिस यांनी कधी मंत्रिपदाची अपेक्षा केली नव्हती. त्यांची अपेक्षा पूर्ण वेगळी व खूप मोठी होती. ती भाजपने पूर्ण केली. त्यामुळे रुदोल्फ खुश आहेत. कामत, संकल्प, मायकल लोबो, सिक्वेरा हे नेते मात्र खुश नाहीत. साडेसहा महिने झाले तरी आपल्याला कोणतेही महत्त्वाचे पद नाही याची जाणीव आणखी काही आमदारांना झालेली आहे. फुटून आपण फसलो की काय असा प्रश्न काहीजणांच्या मनात येतो. मीडियाशी खासगीत बोलताना काही आमदार स्वतःची व्यथा व्यक्त करतात.

मध्यंतरी किनारी भागात खंडणी प्रकरण गाजले. त्यावेळी मायकल विद्यमान सरकारवर फारच संतापले होते. आपण स्थानिक आमदार असताना आपल्याला त्रास देण्यासाठी (किंवा बायपास करून भलतेच कुणी तरी खंडणीराज सुरू करतात याचा राग लोबो यांना आला होता. ते खंडणीराज प्रकरण मायकलनेच एक्स्पोज करून अनेकांना धक्का दिला. सरकारही तेव्हा हादरले होते. शेवटी लोबो यांच्यावर दबाव आणून सरकारने त्यांना घुमजाव करायला भाग पाडले हा विषय वेगळा आहे. साळगावचे केदार नाईक, मुरगावचे संकल्प, सांताक्रूझचे रुदोल्फ, शिवोलीच्या डिलायला आदी अनेकांनी भाजपमध्ये जाऊन काय मिळवले व काय गमावले याचा हिशेब मतदार करतील. तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.

चार वर्षापूर्वी जेव्हा काँग्रेसचे दहा आमदार फुटले होते तेव्हा जनक्षोभ निर्माण झाला होता. त्यामुळेच २०२२ च्या निवडणुकीत अनेकजण जोरात आपटले. बाबू कवळेकर पराभूत झाले. सावित्री कवळेकर हरल्या. फिलीप नेरी, सांताक्रूझचे टोनी फर्नांडिस, सांत आंद्रेचे फ्रान्सिस सिल्वेरा, काणकोणचे इजिदोर फर्नांडिस असे अनेकजण पराभूत झाले. काही आमदारांना वाटते की, आपण एकदा जिंकलो म्हणजे पुन्हा पुन्हा जिंकून येईन. मात्र तसे मुळीच नसते. प्रसाद गावकर, विनोद पालयेकर, जयेश साळगावकर, प्रवीण झांटो आदी अनेकांची उदाहरणे पहा. काहीजण एकदाच जिंकले. काहीजण दोनवेळा जिंकून कायमचे घरी बसले तर काहीजण केवळ माजी बनूनच आयुष्यभर राहिले अशी अनेक उदाहरणे आहेत.

एकदा पराभव झाल्यानंतर पुन्हा जिंकलेच नाही असे दीपक ढवळीकर, दयानंद नार्वेकर, महादेव नाईक, मिकी पाशेको, आवेर्तान फुर्तादो वगैरे अनेक माजी मंत्री आहेत. राजकारण सोपे नसते. एखादा बलाढ्य वाटणारा नेता असा पराभूत होतो की, जमीनही हादरते. लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रिपदी असताना २०१७ साली पराभूत झाले होते. त्यांना पुन्हा २०२२ मध्ये पराभूत व्हावे लागले. सहा महिन्यांपूर्वी जे आठ आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत, त्यापैकीही काहीजण २०२७ मध्ये आपटतील. काहीजण तर वन टाईम एमएलए ठरतील ही लोकांमधील चर्चा नजरेआड करता येत नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: congress rebel mlas joined bjp and its impact in future goa politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.