शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

अग्नितांडव, बेजबाबदार नागरिक व संवेदनाशून्य सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 8:57 AM

एका बाजूला म्हादई डोंगर माथ्यावरील जंगल पेटत होते, तर दुसऱ्या बाजूने होळी पेटवून रंगबिरंगी सोंगे नाचत होती.

श्रीकांत शंभू नागवेकर, मेरशी

"एका बाजूला म्हादई डोंगर माथ्यावरील जंगल पेटत होते, तर दुसऱ्या बाजूने होळी पेटवून रंगबिरंगी सोंगे नाचत होती. दोन दिवसांत २०० हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. त्याच दिवसात मंगलमय वातावरणात भाविक लोक होमकुंडातून जाऊन अग्निदेवतेचा उत्सव साजरा करीत होते. ५ मार्चला सुरू झालेला आगीचा वणवा ६०० हून अधिक ठिकाणी पसरला तरी आमचे लोकप्रतिनिधी रोमटामेळात ढोल बडवण्याचा आनंद लुटत होते. एका बाजूने आगीने चालवलेला विनाश व दुसऱ्या बाजूने उत्सवाचा जयघोष. याला उपहास म्हणावा की विपर्यास समजत नाही.

मार्च महिना सुरू होताच अनेक गावांत पाणीटंचाई सुरू झाली. देवदर्शनासाठी सरकारी तिजोरीतून १५ कोटी फस्त करणारे लोकप्रिय सरकार पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढू शकलेले नाही. २१व्या शतकात पदार्पण केलेला आपला समाज आधुनिक तंत्रज्ञानात मागासलेला कसा? दिवसेंदिवस देवळे बांधण्याचे संकल्प जाहीर करणारे, झुवारी पूल तयार होऊनही केवळ श्रेय मिळावे म्हणून उद्घाटनासाठी लोकांच्या सहनशीलतेशी खेळ करणारे, आगी लागण्याच्या घटना सुरू झाल्यावर चार दिवसांनी आपती व्यवस्थापनाची बैठक घेतात. यावरून सरकार किती संवेदनशील आहे, हे कळून येते.

आगीचा प्रलय नवा नाही. प्रत्येक संस्कृतीचा तो एक विनाशी घटक आहे. एकदा भडका उडाला तर काय व किती स्वाहा करेल हे सांगता येत नाही. आगीचा हा कोप नियंत्रणात आणायला अत्याधुनिक तंत्रज्ञानसुद्धा कमकुवत ठरते. म्हणून 'आगीशी खेळू नका' असा सावधगिरीचा सल्ला वेळोवेळी दिला जातो.

आगीच्या दुर्घटनांमुळे जागतिक पातळीवर दरवर्षी हजारो कोटी रुपयांची साधनसामग्री भस्मसात होते. हजारो लोक बेघर होतात. भारताला आगीचा प्रकोप कित्येक वेळा भोगावा लागला आहे. लहान-मोठ्या आगीच्या घटना घडतच असतात. जेव्हा एखादी घटना महाप्रलयकारी ठरते तेव्हा जगाचे लक्ष वेधून घेते. तरी भारतीय आपत्ती व्यवस्था जागरूक असल्याने जीवितहानी कमी होऊ लागली आहे. तसेच मौल्यवान मालमत्ता व साधनसामग्री वाचवली जात आहे.

बहुतेक आगीच्या दुर्घटना मानवी निष्काळजीपणामुळे घडतात. जवळ जवळ ५० टक्के घटना केवळ शॉर्टसर्किटमुळे होतात. मार्केटमधील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांची गुंतागुंतीची जुळणी पाहून, कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवकार्यात पेटती आरती खाली ठेवल्या जातात व आजूबाजूला लांब कपडे घालून महिला व मुले फिरत असतात. एखाद्या वेळी पेटती ज्योत कपड्याला लागून उत्सवाच्या वातावरणाला गालबोट लागू शकते. भररस्त्यात व दाट वस्तीतही फटाके उडवताना व शोभेचे दारूकाम करताना अतिउत्साही लोकांना कसलेच भान नसते. २०१६ साली केरळच्या पट्टींगल शहरात दारूकाम प्रदर्शन सुरू असताना आगीची एक ठिणगी दारूगोळा ठेवलेल्या ठिकाणी पडून भयंकर स्फोट झाला. १०७ लोकांचा मृत्यू होऊन सुमारे ३५० लोक गंभीर जखमी झाले.

जंगलांना आग लागण्यास मुख्यतः मानवी करणी कारणीभूत असते ९० टक्के घटना मानवाच्या निष्काळजीपणामुळे होतात. बहुदा जळती विडी, पेटती आगकाडी पडून, तसेच जाणूनबुजून आगी लावल्या जातात. उन्हाळ्यात हवा गरम असते व जोरदार वारा वाहात असतो. जंगलात सुका पाला व सुके गवत सर्वत्र पसरलेले असते. त्यामुळे वणवा चटकन पसरतो. जंगलांतील आगीचे उग्र रूप सुदैवी गोवेकरांनी अनुभवलेले नाही. २०१६ साली उत्तराखंडातील जंगलात आग लागून मोठा प्रलय झाला होता. हा वणवा तीन महिने जळत होता. हवाई दलाची हेलिकॉप्टर्स, आपत्ती व्यवस्थापन व जंगल खात्याचे जवळ जवळ ६००० जवान आग विझवण्याचे काम करीत होते. अंदाजे साडेतीन हजार हेक्टरपेक्षा जास्त, म्हणजे पणजी शहराच्या पाचपट जंगल जाळून खाक झाले.

उत्तर भारतात लाकूड व कोळसा माफिया बरेच सक्रिय आहेत. भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने जंगलांतील लाकडांची चोरी करतात व आपले बिंग फुटू नये म्हणून जंगलांना आगी लावतात. अर्धवट जाळलेली झाडे कोळसा म्हणून वापरतात. अशा प्रकारे दुहेरी फायदा करून घेतात. भ्रष्ट समाजाची ही सर्वमान्य नीती बनली आहे.

पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार म्हादई जंगल परिसरातील आग हेतूपुरस्सर लावली गेली आहे. म्हादई अभयारण्याला काही पुढाऱ्यांचा सुरुवातीपासून विरोध होता. तसेच म्हादई पाण्याच्या प्रश्नावर जनआंदोलन पेटत होते. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा डाव नाकारता येत नाही. अरण्य जळत असताना वनमंत्रालय तिकडची वन जैवसंपदा सुरक्षित असल्याचा दावा करते, हे कोणत्या आधारे, हे समजणे कठीण आहे. लोकप्रतिनिधींवर विश्वास ठेवणे हा अंधश्रद्धेचा भाग होऊ लागला आहे.

जंगल आगीमुळे दुर्मीळ वनस्पती भस्मसात होते. त्याचबरोबर मुक्या जनावरांना फार मोठा धोका बसतो. जनावरे पळून सुरक्षित जागी जातात. परंतु त्यांची अन्न साखळी बिघडते. झाडावरील पक्षी उडून जातील. परंतु घरट्यातील अंड्यांचे काय? त्यामुळे प्रजोत्पादन क्रियेवर परिणाम होतो. सूक्ष्म प्राणी व वनस्पतींना कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान वाचवू शकत नाही. बुरशी, शेवाळ, मधमाशीचे पोळे, मुंग्यांची वारुळे, कीटक अशा असंख्य सूक्ष्मजीवांच्या वस्ती आगीत नष्ट होतात. जमिनीवरील माती पकडून ठेवणाऱ्या वनस्पती जळून गेल्यामुळे पावसात जमिनीची धूप वाढते व जमीन नापीक बनते. एकंदरीत सर्व विनाशाला सामोरे जावे लागते. जंगल ही स्वतंत्र जैवसंपदा आहे. एकदा नष्ट झाली की पुनर्निर्मित करता येत नाही. केवळ झाडे लावली म्हणून जंगल निर्माण होत नाही. जंगल निर्माण होण्यास हजारो वर्षांचा कालावधी लागतो.

जंगल ही राष्ट्राची अत्यंत मौल्यवान संपत्ती आहे. गोव्याचा विचार केल्यास खाण व्यवसायाने आधीच जंगल मालमत्ता नष्ट केली आहे. बिल्डर माफियाने बहुतेक डोंगर 'बोडके' केले आहेत. आता निदान उरलेली जंगले सांभाळून ठेवूया, आदर्श नागरिक म्हणून ही जबाबदारी स्वीकारूया.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवा