गोंदिया : जिल्ह्यात आधारभूत किमतीनुसार धान खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन २०१४-१५ मध्ये ३० मे २०१५ पर्यंत एकूण ९ लाख ३४ हजार १८४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीवर शेतकऱ्यांना २५० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे २३ कोटी ३५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मात्र हे अनुदान खरीप हंगामाच्या सुरूवातीला मिळण्याची आशा मंदावली आहे. शेतकऱ्यांना आवश्यकता असते त्यावेळी हा पैसा मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोठा आधार होणार आहे.जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन एजन्सींमार्फत जिल्ह्यात विविध धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना ४७ आणि आदिवासी विकास महामंडळाला ४० अशी एकूण ८७ धान खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली होती. खरेदी केलेल्या धानाचे अनुदान तातडीने मिळण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा आहे.जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या गोंदिया तालुक्यातील कटंगीकला, रावणवाडी, धापेवाडा, दासगाव, टेमणी, आसोली, कोचेवाही, कामठा, मजीपूर, गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव, कालीमाटी, तेढा, कुऱ्हाडी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोरगाव येथील तीन धान खरेदी केंद्र, नवेगावबांध, महागाव, वडेगाव (स्टेशन), धाबेटेकडी, भिवखिडकी, आमगाव तालुक्यातील आमगाव व गोरठा, सालेकसा तालुक्यातील कोटजंभोरा, तिरोडा तालुक्यातील बघोली, भिवापूर, तिरोडा, ठाणेगाव, मेंढा, मुंडीकोटा, चिखली, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, बाम्हणी, मुरपार, पांढरी हे केंद्र सुरू असून तिरोडा तालुक्यातील वडेगाव, येडमाकोट, नवेझरी व विहिरगाव येथील धान खरेदी केंद्रांवर धानाची आवक नसल्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
सानुग्रह अनुदानाची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2015 1:52 AM