अडचणी : माघार घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवसगोंदिया : जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे चित्र सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या तरी सर्वच उमेदवारांनी डोक्याला बाशिंग बांधले असले तरी किती लोकांनी रिंगणात माघार घेतली हे सोमवारी स्पष्ट झाल्यानंतर निवडणुकीचा खरा रणसंग्राम सुरू होणार आहे. दुसरीकडे दररोज पावसाची हजेरी सुरू असल्यामुळे उमेदवारांच्या प्रचारात चांगलाच व्यत्यय येत आहे.येत्या ३० जूनला मतदान होणार असल्याने उमेदवारांना आता प्रचारासाठी अवघे ८ दिवस उरले आहेत. या आठ दिवसात मतदार संघातील सर्व गावांमध्ये पोहोचून जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क करणे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. दुसरीकडे बहुतांश मतदार शेतकरी आहेत. सतत पाऊस येत असल्याने सर्व शेतकऱ्यांना पेरणीचे वेध लागले आहेत. त्यासाठी बियाण्यांची सोय करण्यात आणि पेरणी करण्यात शेतकरी वर्ग व्यस्त आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग दिवसभर शेतीच्या कामात व्यस्त राहून रात्रीच्या वेळी निवडणुकीच्या चर्चांमध्ये रंगताना दिसत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)अद्याप आचारसंहिता भंग नाहीजिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ३ लाख रुपये तर पंचायत समिती निवडणुकीसाठी २ लाख रुपयांची खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विधानसभा-लोकसभा निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीही पहिल्यांदाच निरीक्षकांची (आॅब्झर्वर) नियुक्ती करण्यात आली आहे. दोन तालुक्यांमिळून एक असे चार निरीक्षक जिल्ह्यात आहेत. मात्र अद्यापपर्यंत आचारसंहिता भंग झाल्याचा एकही गुन्हा नोंद झाला नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
उमेदवार प्रचारात, शेतकरी लागवडीत व्यस्त
By admin | Published: June 21, 2015 1:06 AM