डाळ झाली आवाक्याबाहेर : मागील तीन महिन्यांत आली तेजी कपिल केकत गोंदिया‘दाल-रोटी खाओ, प्रभु के गुन गाओ’ जुन्या चित्रपटातील हे गाने गरीबांच्या जीवनाचे वास्तव्य दर्शवीत होते. आज मात्र गरीबच काय तर चांगल्या धनाढ्यांनाही डाळींनी घाम फोडला आहे. यामुळेच दाल-रोटीतील ‘दाल’ आता ताटातून हद्दपार झाली आहे. २० हजाराचा दर ओलांडणारी डाळ आज थोडीफार उतरून १६ हजार ५०० रूपयांवर आली असली तरी तिची खरेदी करणारा ग्राहक उरलेला नाही. अन्य धान्य साधारण असले तरी डाळींनी सर्वसामान्यांचे बजेट बिघडवून टाकले आहे. यामुळेच दिवाळीतील फराळाच्या मेनुतून डाळींचे पदार्थ यंदा आऊट होणार यात शंका नाही. झपाट्याने बदलत चाललेल्या या जगात सर्वांची धडपड सुरू आहे चांगले खाने व चांगले राहणे यासाठी. मात्र आजची स्थिती बघता वाढत्या महागाईने भल्याभल्यांचे कंबरडे मोडले असून चैनीच्या वस्तू आवाक्यात असल्या तरी दोन वेळचे जेवण मात्र हाताबाहेर जाऊ लागले आहे. पूर्वी कांदा-पोळी किंवा वरण-पोळी खाऊन जीवन जगू असे म्हटले जात होते. मात्र मध्यंतरी कांद्याने रडवून सोडले. त्यामुळे कांदा-पोळीची जोडी तुटली. त्यानंतर वरण-पोळीची जोडी जमली असतानाच आता डाळींचे दर चढल्याने वरण-पोळीचीही जोडी तुटली आहे. त्यात भाज्यांचे दरसुद्धा चढलेले असल्याने पोळीसोबत खायचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा ठाकला आहे. मागील तीन महिन्यांत डाळींचे हे दर अचानक वाढले असून यामुळे फक्त २५ टक्क्यांवर डाळींचा व्यापार आला आहे. परिणामी पूर्वी बोलाविण्यात येत असलेल्या माला पेक्षा कितीतरी कमी प्रमाणात आम्ही डाळी बोलावित असल्याचे येथील धान्यांचे थोक व्यापारी महालक्ष्मी अनाज भंडारचे संचालक रितेश अग्रवाल सांगतात. नवीन पीक आल्यावर डाळींचे दर काही प्रमाणात पडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवीत यंदाच्या दिवाळीवर याचा प्रभाव पडणार असल्याचेही अग्रवाल म्हणाले.
फराळाच्या मेनूवर डाळींचा प्रभाव
By admin | Published: October 26, 2015 1:50 AM