गोंदिया : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत असणाऱ्या बारवरील कारवाईत होत असलेल्या दिरंगाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अपुरे मनुष्यबळ कारणीभूत असल्याचे कारण या विभागाच्या वतीने दिले जात आहे. असे असले तरी या गंभीर बाबीसाठी कारवाई करण्यास २ वर्षातही वेळ मिळू नये, ही बाब खटकणारी ठरत आहे.‘बिअर बार’चा परवाना रद्द करण्याचा आदेश एक्साईज विभागाच्या (राज्य उत्पादक शुल्क) आयुक्तांनी दोन वर्षांपूर्वी काढला होता. मात्र गोंदिया जिल्ह्यातील दोन एक्साईज निरीक्षकांपैकी गोंदियाच्या निरीक्षकांनी या आदेशावर कोणतीच कारवाई केली नाही. मनुष्यबळ नसण्याची ही समस्या गेल्या दोन वर्षांपासून अशीच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा प्रकार त्या बारमालकांना संरक्षण देणारा असून त्यांच्याशी असलेल्या जवळीकतेतूनच कारवाई करण्याचे टाळले जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून कोणतेही वाईन बार (परमीट रूम) अनुक्रमे ५० आणि ७५ मीटरपेक्षा जास्त अंतरावर असणे गरजेचे आहे. या नियमात न बसणाऱ्या बारचा परवाना रद्द करण्यात यावा असा आदेश उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी दोन वर्षांपूर्वी दिला. त्यानुसार गोंदिया व देवरीच्या निरिक्षकांना वारंवार स्मरणपत्र देऊनही त्यांच्याकडून कारवाई का होत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. विशेष म्हणजे देवरीच्या निरीक्षकांनी डिसेंबर २०१४ मध्ये पाठविलेल्या अहवालावरही अद्याप कारवाई झालेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
मनुष्यबळाअभावी एक्साईज विभाग हतबल
By admin | Published: July 05, 2015 2:03 AM