केशोरी : निसर्गाच्या लहरीपणाची जाणीव बळीराजाला असून सुद्धा नव्या विश्वासाने, नव्या देमाने या भागातील शेतकरी मान्सून हवामानाचा अंदाज घेवून व सर्व दु:खे बाजूला सारुन निसर्ग यावर्षी आपल्याला चांगली साथ देईल. या भोळ्या समजवूत्तीने रखरखत्या उन्हात शेतीच्या मशागतीच्या कामात शेतकरी वर्ग लागल्याचे चित्र दिसून येत आहेत.या वर्षीचे उन्हाळी धानपिक शेतकऱ्यांच्या हातात पडले. परंतु धानाला योग्य भाव आणि आधारभूत केंद्रावरील वाढत्या गर्दीने शेतकऱ्यांना निराशच व्हावे लागते. केव्हा बारदान्याअभावी तर कधी जागे अभावी शेतकऱ्यांचे धान घेण्यास आधारभूत केंद्र टाळत असल्याचे सांगण्यात आले. असे प्रसंग शेतकऱ्यांवरती येवूनही नव्या उमेदीने वेळात वेळ काढून शेतातील पालापाचोळा जाळणे, नागरणी करुन ठेवणे, तणनाशक औषध टाकून ठेवणे, शेणखत टाकणे इत्यादी कामे परिसरात दृष्टी टाकल्यानंतर बळीराजा मोठ्या जोमाने काम करीत असल्याचे दिसून येते.धानाला योग्य भाव मिळत नसताना देखील धानाचे उत्पादन काढण्याचा सतत शेतकरी प्रयत्न करीत असतो. धानाच्ळा योग्य भावासंबंधी कोणाकडे दाद मागावी हा नेहमीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. परंतु माझी भात खाणारी लेकरं उपासी राहू नयेत या भावनेने बळीराजा शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. उन्हाची तीव्रता अधिक असताना सुद्धा शेतकऱ्यांना उन्हाची पर्वा नाही. धान शेतीत उत्पन्न कसा घेता येईल, याचाच विचार शेतकरी करीत असतो. फक्त निसर्गाने साथ देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
बळीराजा गुंतला मशागतीच्या कामाला
By admin | Published: June 15, 2015 12:48 AM