गोंदिया : अपंग बांधव हे समाजाचा महत्वाचा घटक आहे. समाजाने त्यांच्याकडे हीन भावनेने बघू नये. शासकीय सेवेत अपंगासाठी तीन टक्के आरक्षित जागा आहे. ज्या विभागात अपंगांची रिक्त पदे आहेत ते त्वरित भरण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.स्वातंत्र्यदिनी प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीतील सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), नाविण्यपूर्ण योजना सन २०१४-१५ अंतर्गत जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र आणि संकल्प बहुउद्देशिय संस्था गोंदिया यांच्या संयुक्त वतीने अपंग व्यक्तींना साहित्य व साधनांच्या वाटप कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील वरिष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉ. सजल मित्रा, वरिष्ठ शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र जैन, शिक्षणाधिकारी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री बडोले म्हणाले, अपंगांना प्रत्येक जिल्ह्यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था जीवनदायी योजनेच्या हॉस्पीटलमधून करण्यात येईल. पाचवीनंतर अपंग विद्यार्थ्यांंना शिक्षण मिळत नाही. त्यांच्यासाठी विशेष शाळा पुणे व नागपूर येथे सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगिगतले. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, अपंग व्यक्ती हे दुसऱ्यावर अवलंबून असतात. अशा साहित्याच्या वाटपामुळे ते स्वावलंबी होण्यास मदत होईल. आरोग्य सेवेचे अधिकारी चांगली सेवा देतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास आणखी चांगली आरोग्य सेवा देता येईल. यावेळी १५ अंपग व्यक्तीना तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. २० अपंग विद्यार्थ्यांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. हे विद्यार्थी सुध्दा यावेळी त्यांच्या पालकांसमवेत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अशोक चौरसिया, डॉ. अविनाश येरमे, डॉ. आनंद कुकडे, मिश्रा, विजय ठोकणे यांनी परिश्रम घेतले. संचालन बी.एन. पडोळे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)पालकमंत्र्यांची अपंग पुनर्वसन केंद्राला भेट ४पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी १५ आॅगस्ट रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात असलेल्या जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. रवि धकाते प्रामुख्याने उपस्थित होते. हे पुनर्वसन केंद्र संकल्प बहुउद्देशीय संस्था चालवित आहे. या केंद्रात अपंग व्यक्तींवर फिजीओथेरपीतून उपचार, विविध प्रकारच्या अस्थिव्यंग व्यक्तीवर उपचार, बहिरेपण असलेल्या मुलांना आॅडिओमेट्री विभागात उपचार, अपंगाच्या विविध लाभाच्या योजनांचे अर्ज, विविध प्रकारच्या सुविधा, समुपदेशन आणि विविध प्रकारचे अपंगविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्र्यांना संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र जैन यांनी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक चौरसिया, सचिव डॉ. सतीश जायस्वाल, बी.एन. पडोळे उपस्थित होते. संस्थेच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीकरीता पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
अपंगांची तीन टक्के रिक्त पदे भरणार
By admin | Published: August 18, 2015 2:01 AM